जवळाबाजार : पुढारी वृत्तसेवा : देशात मोठ्या प्रमाणात भाववाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. आता खरीप हंगामात शेतकरी बांधवांना पेरणीसाठी लागणारे सोयाबीनसह इतर बियाणे आणि रासायनिक खतांमध्ये मोठ्या प्रमाणात भाववाढ झाली आहे. मागील दोन वर्षांमध्ये देशात कोरोनाचा प्रादुर्भाव होता. या काळात शेतकऱ्यांना उत्पादीत माल कवडीमोल भावाने विक्री करावा लागला होता. या वर्षी रब्बी हंगामात शेतीचे उत्पादन चांगले झाले. पण मालाची आवक जास्त तर भाव कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
आगामी खरीप हंगामातील पेरणीसाठी १५ दिवस शिल्लक राहिले आहेत. आणि सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांकडून खरीप हंगामात नगदी पीक सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जात आहे. या वर्षी खरिपाच्या हंगाम सुरू होण्याचा अगोदर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनची बोगस बियाणे आढळून आली आहेत. राज्यामध्ये सोयाबीन मध्य प्रदेशमधून विक्रीसाठी येत असते. अमरावती, अकोला, जालना, औरंगाबाद, नांदेड येथे सोयाबीन बियाणांचे पॅकिंग करण्यात येते. या दरम्यान, बियाणांमध्ये भेसळ होण्याचे प्रकार समोर आले आहेत. काही ठिकाणे बोगस बियाणांचे साठे सापडले आहेत.
खरीप व उन्हाळी हंगामात सोयाबीनचे उत्पादन चांगले मिळाले. बाजारात विक्रीसाठी सोयाबीन मोठ्या प्रमाणात आले. पण मागील वर्षीपेक्षा यावर्षी सोयाबीनच्या दरात २५० ते ५०० रुपयांची भाववाढ झाली आहे. तर रासायनिक खतांमध्ये डीएपी खतांची मागणी मोठी आहे. डीएपी बरोबर इतर खतांच्या दरातसुध्दा १०० ते ३०० रुपयांची वाढ झाली आहे. डीएपी खताची मागणी जास्त व पुरवठा कमी अशी परिस्थिती आहे. एकंदरीतच या वर्षी शेतकऱ्यांना सोयाबीन व खतांची चढ्या दराने खरेदी करावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भाववाढीचा फटका सहन करावा लागत आहे.
खरिप हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणात घरगुती सोयाबीन बियाणांचा वापर करीत आहेत. तर खतामध्ये डीएपीची मागणी मोठी आहे. पण पुरवठा कमी प्रमाणात होत आहे
– प्रशांत रुद्रवार, आदर्श कृषी केंद्र, जवळाबाजार