

तुळजापूर -तुळजाभवानी देवीच्या मंदिर परिसराचा विकास करताना प्राचीन दगडी वास्तुकलेला जपून नव्या कामांमध्ये दगडी बांधकाम व नक्षीकामाला विशेष महत्त्व दिले जात आहे. आगामी ५० वर्षांचा विचार करून ही विकासकामे हाती घेण्यात आली असून दर आठवड्याला या कामांचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार पाटील यांनी सांगितले की, मे महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तुळजापूर दौरा अपेक्षित आहे. मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामांची सुरुवात लक्षात घेता, मुख्य महाद्व ारातून भाविकांना प्रवेश देण्याबाबत तसेच दर्शन मंडपाच्या जागेची निश्चिती स्थानिकांच्या भावना आणि पुजारी
मंडळाच्या सूचनांचा विचार करून करण्यात आली आहे. या विकास आराखड्याला राज्य शासनाची मान्यता मिळाली असून राज्य पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक बदल केले जात आहेत. शिखर बांधकामासंदर्भात आयआयटीकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्य शासन भाविकांना अधिक चांगल्या सुविधा आणि जलद दर्शन मिळावे यासाठी तिरुपती
बालाजी येथील दर्शन व्यवस्थेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कामकाज करत आहे. कुलधर्म व कुलाचार पार पाडण्यासाठी मातंगी मंदिराच्या बाजूस स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मंदिर परिसरातील पुजारी बांधवांची घरे व दुकाने यासंदर्भात समाधानकारक मोबदला देण्याचा प्रयत्न सुरू असून सुमारे ७० जागा मालकांनी यासाठी सहमती दर्शविली आहे.
तसेच विविध विकासकामांबाबत जनतेच्या भावना समजून घेण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने सुमारे ५० विकास मित्र नियुक्त करण्याची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले. याशिवाय तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी संपूर्ण महिनाभर 'जनता दरबार' आयोजित करण्यात येणार असून, सभापती विक्रम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित राहतील.
या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्न जा-गेवर सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या पत्रकार परिषदेस नगराध्यक्ष विनोद गंगणे, उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, भाजप तालुकाध्यक्ष आनंद कंदले, गटनेते औदुंबर कदम, नगर-सेवक सागर कदम, युवक नेते संदीप गंगणे, विशाल छत्रे आणि रत्नदीप भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.