

कालिदास गोरे
लोहारा : लोहारा तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. तालुक्यात अनेक भागांत पेरणीयोग्य पाऊस झालेला नसल्याने पेरण्या रखडल्या आहेत, तर काही भागांत तुरळक पावसाच्या भरवशावर धाडसाने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट घोंघावत आहे. पेरणीनंतर पावसाने पुन्हा उघडीप दिल्याने उगवलेली पिके धोक्यात आली असून, दिवसेंदिवस दुष्काळाचे सावट अधिक गडद होत असल्याचे चित्र आहे.
गेल्या वर्षी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यंदा मात्र पावसाअभावी शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे 'गेल्या वर्षी पावसाने मारले, यंदा पाऊसच नाही', अशी व्यथा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. लोहारा तालुक्यातील काही भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, काही ठिकाणी पेरणीसाठी आवश्यक असलेला दमदार पाऊसच झालेला नाही. तुरळक पावसाच्या भरवशावर काही शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, उडीद, मूग यांसह विविध खरीप पिकांची पेरणी केली.
मात्र पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे, त्यांना आता पिकांची उगवण आणि वाढ याबाबत चिंता लागली आहे. तर ज्यांनी पेरणी केलेली नाही, त्यांच्यासमोर पुढील काळात पेरणी करायची की नाही, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाची निश्चितता नसताना महागडे बियाणे, खते, मशागत आणि मजुरीवर खर्च करण्याचे धाडस करणे शेतकऱ्यांना कठीण जात आहे.
शेतकऱ्यांना एकरी ५० हजारांची तातडीची मदत द्या
यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याऐवजी शासनाने ठोस आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेल्या भागातील शेतकऱ्यांना एकरी किमान ५० हजार रुपये तातडीची मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. तसेच पीकविमा, कर्जपुनर्गठन, व्याजमाफी, वीजबिल सवलत आणि पुढील हंगामासाठी बियाणे-खते उपलब्ध करून देण्याबाबतही शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आहे.