

Umarga Agrotech Company Fire
उमरगा : तालुक्यातील लातूर–गुलबर्गा महामार्गालगत बिरूदेव मंदिरासमोरील औद्योगिक वसाहतीतील एका अॅग्रोटेक कंपनीत रविवारी (दि. १५) दुपारी सुमारे तीनच्या सुमारास साठवून ठेवलेल्या बगॅसच्या मोठ्या ढिगाऱ्याला अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत अंदाजे तीन ते साडेतीन हजार टन बगॅस जळून खाक झाला असून सुमारे ८० ते ९० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सदर अॅग्रोटेक कंपनीच्या खुल्या परिसरात विविध साखर कारखान्यांकडून आणलेला बगॅस मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आला होता. दुपारी पावणे तीनच्या सुमारास अचानक आग लागल्याने कर्मचाऱ्यांमध्ये एकच धांदल उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला कळविण्यात आले. दरम्यान, कंपनीच्या यंत्रणेमार्फतही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले; मात्र आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले.
घटनेची माहिती मिळताच उमरगा व मुरूम येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुमारे चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रात्री साडेसातच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. आगीमुळे उठणारे धुराचे लोट चार ते पाच किलोमीटर अंतरावरूनही दिसत होते.
कंपनी व्यवस्थापनाने तीव्र उष्णतेमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. मात्र सध्या परिसरात उन्हाची तीव्रता फारशी नसून रविवारी दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरण होते. त्यामुळे सात वर्षांत दुसऱ्यांदा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. आग नैसर्गिक कारणाने लागली की मुद्दाम लावण्यात आली, याबाबत विविध चर्चा सुरू असून या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
सात वर्षांतील दुसरी घटना
याच औद्योगिक वसाहतीतील अॅग्रोटेक कंपनीत १६ एप्रिल २०१९ रोजी पहाटे तीनच्या सुमारास उघड्यावर साठवून ठेवलेल्या बगॅसच्या साठ्याला आग लागली होती. त्यावेळी वीज पडल्यामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. सात वर्षांनंतर पुन्हा अशाच प्रकारची घटना घडल्याने या आगीमागील कारणांबाबत शंका उपस्थित होत आहेत. यावेळी कंपनी व्यवस्थापनाकडून तीव्र उन्हामुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.