

परमेश्वर पालकर
कळंब : कळंब तालुक्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांनी माना टाकल्या आहेत. सोयाबीन सध्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाने ओढ दिल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. येत्या चार दिवसांत पाऊस न झाल्यास शिल्लक सोयाबीन पीकही हातचे जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
तालुक्यात आठ महसूल मंडळे असून ७१ हजार १८३ खातेदारांचे सुधारित क्षेत्र ९१ हजार ६७२ हेक्टर आहे. यातील ६ हजार १२२ हेक्टर पोटखराब क्षेत्र वगळता ८५ हजार ५५० हेक्टर लागवडीयोग्य क्षेत्रापैकी ८४ हजार ७४८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ७० हजार ९६६ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे.
गतवर्षी अतिवृष्टीमुळे मांजरा धरण भरल्याने यंदा शेतकऱ्यांनी ९ हजार ३२२ हेक्टरवर उसाची लागवड केली आहे. मात्र, पावसाअभावी विहिरी, बोअर, नद्या व नाले आटू लागल्याने उसाचे पीकही संकटात सापडले आहे.
गतवर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले होते. यंदा शेंगा भरण्याच्या काळातच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतीवरच उपजीविका असलेल्या कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे.
यंदा मृग नक्षत्रापासूनच पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले. आता परतीचा पाऊसही वेळेवर झाला नाही तर रब्बी हंगामावरही संकट येण्याची शक्यता आहे. पावसासाठी तालुक्यात विविध ठिकाणी पर्जन्ययज्ञ व प्रार्थना करण्यात येत असून शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.