

धाराशिव : भूम तालुक्यातील गिरवली येथे सात वर्षांपूर्वी मंजूर झालेले ३३ केव्ही वीज उपकेंद्र अद्याप कार्यान्वित न झाल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी सोमवारी महावितरणच्या धाराशिव कार्यालयावर गाढव मोर्चा काढत तीव्र आंदोलन केले. मागण्यांवर महिनाभरात कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
गिरवली येथील ३३ केव्ही उपकेंद्रासाठी जागेचा प्रश्न पुढे करून काम रखडविण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. आवश्यक जागा उपलब्ध करून दिल्यानंतरही प्रशासकीय दिरंगाईमुळे शेतकरी व नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. वीजपुरवठ्यातील अडचणींमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असून काही ठिकाणी वीजतारा कोसळून जनावरे दगावल्याचाही दावा करण्यात आला.
याशिवाय डोकेवाडी पाणीपुरवठा योजनेसाठी स्वतंत्र रोहित्र, विविध वस्त्यांवर एकेरी वीजपुरवठा सुरू करणे, ओव्हरलोड रोहित्रांच्या जागी नवीन रोहित्र मंजूर करणे, मागासवर्गीय वस्त्यांना वीज सुविधा उपलब्ध करून देणे आदी मागण्याही निवेदनाद्वारे करण्यात आल्या.या मागण्यांसाठी यापूर्वीही निवेदने व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयापासून महावितरण कार्यालयापर्यंत गाढव मोर्चा काढला.
या आंदोलनामुळे काही काळ शहरातील वाहतुकीवर परिणाम झाला.आंदोलनात पंचायत समिती सदस्य बाळासाहेब खरवडे, खरेदी-विक्री संघाचे संचालक रवींद्र पवार, ग्रामपंचायत सदस्य शहाजी सोन्ने, प्रकाश कोल्हे, लक्ष्मण चव्हाण, विविध विकास कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब मोटे यांच्यासह गिरवली, अंजनसोडा, ईट व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.