

Farmers, traders demand repeal of cow slaughter ban law
वाशी, पुढारी वृत्तसेवा : शासनाने लागू केलेला गोहत्याबंदी सुधारित कायदा २०१५ रद्द करण्यात यावा, अशी मागणी वाशी तालुक्यातील शेतकरी, व्यापारी आणि पशु वाहतूकदारांनी केली आहे. या कायद्यामुळे शेती आणि पशुपालनावर नकारात्मक परिणाम होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या सर्वांनी तहसीलदार कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना एक निवेदन पाठवले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, २०१५ च्या कायद्यामुळे निरुपयोगी किंवा भाकड जनावरांची खरेदी-विक्री करणे अत्यंत अवघड झाले आहे. जुनी जनावरे विकल्याशिवाय शेतकरी नवीन दुभती जनावरे किंवा बैल खरेदी करू शकत नाहीत. पण या कायद्यामुळे हे व्यवहार थांबले आहेत, ज्यामुळे शेतकरी आणि व्यापारी अडचणीत आले आहेत.
निवेदनानुसार, कधीकधी शेतीच्या कामासाठी दुभत्या गायी, म्हशी किंवा बैल घेऊन जाताना कथित गोरक्षक आणि पोलिसांकडून वाहने अडवली जातात. नंतर ही जनावरे गोशाळेत जमा केली जातात. गोश ाळेतून जनावरे परत मिळवण्यासाठी अनेक अडचणी येतात आणि जरी ती परत मिळाली तरी त्यांची अवस्था फारच वाईट झालेली असते.
यामुळे दुग्ध व्यवसाय आणि शेतीवर परिणाम होत असून, शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. या निवेदनावर विठ्ठल दगडू कोकाटे, देवदत्त रामलिंग पवार, रमेश महादेव साळुंके, महादेव गायकवाड, दिलीप लगाडे, सिध्देश्वर गादेकर, बाबा कुरेशी, आदी शेतकरी, व्यापारी आणि वाहनधारकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या सर्वांनी एकत्रितपणे हा कायदा रद्द करण्याची मागणी केली आहे.