

Efforts to provide relief farmer through crowd funding
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : पशुधन दगावले आहे, विहिरी खचल्या आहेत, गाळाने भरल्या आहेत तर अनेक ठिकाणी अक्षरशः शेतजमीनच महापुरामुळे खरडून गेली आहे.
अल्पभूधारक आणि अत्यल्पभूधारक शेतकरी बांधवांना राज्य शासनाच्या अनुदानातून दिलासा मिळणार आहेच. मात्र जिल्ह्यातील बहुभूधारक शेतकरी बांधवांनाही अशा बिकट परिस्थितीत दिलासा मिळणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे या अभुतपूर्व नुकसानीतून सावरण्यासाठी बहुभूधारक शेतकऱ्यांनाही मदत मिळावी यासाठी आपला पाठपुरावा सुरु आहे.
गरजेनुसार क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून दिलासा देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यातील नुकसान भीषण आहे. जिल्ह्यातील ७३३ गावांना अतिवृष्टी आणि महापुराचा तडाखा बसलेला आहे. जिल्ह्यातील ९ जणांचा यात बळी गेला. महापुरात बुडून मयत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना आपण तातडीने मदत दिली आहे.
९ पैकी ७ कुटुंबांना प्रत्येकी ४ लाख याप्रमाणे २८ लाख रुपयांच्या मदतीचे आत्तापर्यंत वितरण करण्यात आले आहे. दोन प्रस्ताव प्रलंबित असून त्याची रक्कमही लवकरच संबधित कुटुंबाला देण्यात येईल. संपूर्णपणे खचलेल्या विहिरींची संख्या १३९७ एवढी आहे तर २८६ विहिरींचे अंशतः नुकसान झालेले आहे. जिल्ह्यातील एकूण १६८३ विहिरी खचल्या आहेत. यात भूम तालुक्यातील सर्वाधिक ७२३ विहिरींचा समावेश आहे तर त्यापाठोपाठ परंडा तालुक्यातील ५४० विहिरींचे मोठे नुकसान झाले आहे. धाराशिव तालुक्यातील २५, तुळजापूर ३०, उमरगा २८, लोहारा १६, कळंब २२ तर वाशी तालुक्यात १३ विहिरींचे नुकसान झाले आहे. जे अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांच्या विहिरीसाठी सरकारी अनुदान आणि मदत मिळणार आहेच मात्र बहुभूधारक शेतकरी बांधवांनाही दिलासा मिळावा यासाठी राज्य सरकारकडे आपला पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यातील एकूण ४२७ गावातील तब्बल ८८७९ हेक्टर जमीन महापुरामुळे खरवडून गेली आहे. परंडा तालुक्यातील सर्वाधिक ३९०० हेक्टर तर त्यापाठोपाठ कळंब तालुक्यातील १७६१ आणि भूम तालुक्यात १६७५ हेक्टर जमीन खरवडून गेली आहे. धाराशिव तालुक्यातील १७४ हेक्टर, तुळजापूर तालुक्यात ७४ हेक्टर, उमरगा ३६२ हेक्टर आणि वाशी तालुक्यातील ४९८ हेक्टर जमिनीचा यात समावेश आहे. गाळ साचलेल्या जमिनीचे क्षेत्रही मोठे आहे. जिल्ह्यातील ९ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर गाळ साचलेला आहे. या सगळ्या जमिनी पूर्ववत करण्यासाठी मोठे रचनात्मक काम करावे लागणार आहे.
त्यासाठी अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकारी अनुदान आणि मदत मिळणार आहेच. अगदी त्याचप्रमाणे बहुभूधारक शेतकऱ्यांनाही खरवडून गेलेल्या जमिनीच्या दुरुस्तीसाठी मदत मिळावी यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे. यंदाच्या पावसाळ्यात एक जूनपासून ते आजवर जिल्ह्यात मयत झालेल्या जनावरांची संख्याही मोठी आहे. दुधाळ मोठी, दुधाळ लहान, ओढकाम करणारी मोठी आणि लहान असे एकूण ५९० इतके पशुधन दगावले आहे.
येथेही प्रति जनावर राज्य सरकारने जाहीर केलेली मदत अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र या नुकसानीचा फटका बहुभूधारक शेतकरी बांधवांना बसू नये त्यांनाही सरकारी नियमाप्रमाणे आर्थिक दिलासा मिळावा यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. राज्य सरकार अत्यंत संवेदनशीलपणे विचार करीत असून या सर्व शेतकरी बांधवांनाही नक्कीच दिलासा दिला जाईल असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला. या व्यतिरिक्त क्राऊड फंडिंगच्या माध्यमातूनही आपण ज्यांना ज्यांचे नुकसान खूप जास्त आहे त्यांना मदत करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचेही आमदार पाटील यांनी म्हटले आहे.