

Dharashivkar citizens protest for roads
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा :
शहरातून जाणाऱ्या बार्शी -बोरफळ राज्य मार्गाचे काम लवकर सुरू करावे तसेच यामध्ये फक्त रस्तेच नव्हे तर दोन्ही बाजूने नाल्या, रस्त्यामध्ये दुभाजक, फुटपाथ व दिवाबत्तीचीही तरतूद करावी. या मागणीसाठी धाराशिवकर गुरुवारी रस्त्यावर उतरले. यात विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता. राजमाता जिजाऊ चौक ते उंबरे कोटा या मंजूर रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, शहरातील १४० कोटीतून होणाऱ्या ५९ डीपी रस्त्यांचीही कामे हाती घ्यावीत या प्रमुख या मागण्यासाठी धाराशिव शहर वासियांनी आर. पी. कॉलेज समोर रास्ता रोको आंदोलन केले.
आक्रोश रस्त्यांचा हक्क जनतेचा, अशा घोषणा देत शेकडो नागरिक रस्त्याची कामे व्हावीत या मागणीसाठी रस्त्यावर उतरले. सांजा गावापर्यंत दोन्ही बाजूने बार्शी - धाराशिव - बोरफळ राज्य मार्ग शहरातून जात आहे. या कामाचा कार्यारंभ आदेश नऊ ऑक्टोबर २०२४ रोजी निघाला आहे. राजमाता जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नाल्या, दुभाजक व दिवाबत्ती या सोयीचा समावेश करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
राजमाता जिजाऊ चौक ते उंबरे कोटा हा रस्ता देखील मंजूर असून त्याचेही काम तातडीने करावे तसेच शहरातील १४० कोटींच्या ५९ डीपी रस्त्याची निविदा प्रक्रिया होऊनही काम होत नव्हते. तेव्हा जन आंदोलन करून व उपोषणाचे हत्यार उपसल्यावर प्रशासन जागे झाले होते.
पण पुन्हा त्याला विलंब होत असून त्याचेही स्मरण या आंदोलनात करून दिले आहे. शिवाय या राज्य मार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरवात होण्याअगोदर रस्त्यावरील खड्डे पाऊस असेल तर सिमेंट काँक्रेटन बुजवावे, पाऊस असेल तर डांबरीकरणातून रस्त्याची दुरुस्ती करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
जिजाऊ चौक ते उंबरे कोटा या रस्त्यावरील खड्डे पावसाची उघडीप मिळताच डांबरीकरण करून बुजवण्यात येतील, असे लेखी आश्वासन नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी दिले. यावेळी शहरातील नागरिक व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.