

Congress demands transparency in the education system
भूम, पुढारी वृत्तसेवा : शिक्षण व्यवस्थेतील कथित अनागोंदी, नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरण आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ भूम तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत सादर करण्यात आले.
निवेदनात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण व्यवस्थेत गेल्या काही वर्षांपासून अनागोंदी सुरू असून, विविध स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला.
विशेषतः नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. तसेच या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईचा निषेध करण्यात आला.
शिक्षण व्यवस्था अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात. संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. यावेळी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विलास शाळू, भूम तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. सिराज मोगल, नगरसेवक रुपेश शेंडगे, अॅड. मुशरफ सय्यद, समायोदीन काझी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.