

उमरगा : सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती (एससी) आरक्षणांतर्गत उपवर्गीकरण करण्यास दिलेल्या मान्यतेची राज्यात तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी करीत सकल मातंग समाजाच्या वतीने शुक्रवारी (दि. २४) तहसील कार्यालयावर भव्य महामोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदारांमार्फत राज्य शासनाला निवेदन देण्यात आले.
शहरातील हुतात्मा स्मारक ते तहसील कार्यालया पर्यंत अनुसूचित जाती (एससी) ५९ जाती (अ ब क ड) आरक्षण उपवर्गीकरण समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चात आरक्षण उपवर्गीकरण समर्थनार्थ दिलेल्या जोरदार घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचताच त्याचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सभेत रूपांतर झाले.
यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, माजी आमदार सुधाकर भालेराव, लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे, आझाद क्रांती सेना अध्यक्ष राजेश घोडे, लक्ष्मण क्षीरसागर, अॅड. सुखदेव होळीकर, नागीण कांबळे, शिवाजी गायकवाड, दिलीप गायकवाड, संजय सरवदे आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयामुळे अनुसूचित जातींतील सर्वाधिक मागास व वंचित घटकांना आरक्षणाचा न्याय्य लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आरक्षणाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून सामाजिक समतेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उपवर्गीकरण आवश्यक आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात अपेक्षित केलेल्या सामाजिक न्याय आणि समतेच्या तत्त्वांची प्रभावी अंमलबजावणी उपवर्गीकरणामुळे होणार असल्याचे नमूद करून आरक्षण प्रवर्गातील सर्व जातींचा समान विकास झालेला नाही, उपवर्गीकरणामुळे मागास घटकांना शासकीय सेवा व शिक्षणामध्ये योग्य प्रतिनिधित्व मिळेल,
महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची राज्यात तातडीने अंमलबजावणीची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. मोर्चात विजय तोडकर, तुळशीराम देडे, मारुती गायकवाड, सर्जेराव बनसोडे, छाया नायकवडी, अजय सरवदे, सीताराम कांबळे, अँड भागवत सगर, मनोज कांबळे आदींसह संविधानप्रेमी नागरिक, युवक-युवती, महिला व सकल मातंग समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा दरम्यान पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा बंदोबस्त ठेवला होता.