

धाराशिव : निजामाच्या रझाकारांविरोधात लढून आपण स्वातंत्र्य मिळविले; मात्र आता भाजप-शिवसेनेच्या रूपातील ‘रझाकारां’विरोधात रस्त्यावर उतरावे लागणार आहे, असा घणाघाती हल्ला माजी विरोधी पक्षनेते तथा ठाकरे शिवसेनचे आ. अंबादास दानवे यांनी येथे दिला. शिवसेनेच्या ‘तुमसे ना हो पायेगा’ आंदोलनात मंगळवारी (दि. ८) ते बोलत होते.
मराठवाड्याच्या विकासासाठी १७ सप्टेंबर २०२३ रोजी ४४ हजार कोटींच्या घोषणा करण्यात आल्या; मात्र त्या हवेतच विरल्या. धाराशिव जिल्ह्याचा तीन वर्षांत केवळ दीड टक्के विकास झाला असून, २००४ पासून रखडलेल्या कृष्णा-मराठवाडा प्रकल्पाचे २३.६६ टीएमसी पाणी अद्याप जिल्ह्यात आलेले नाही. विकासकामांच्या निविदा केवळ टक्केवारीसाठी काढल्या जात असल्याचा आरोपही दानवे यांनी केला.
तुळजाभवानी मंदिर विकासासाठी १,८०० कोटींचा प्रकल्प असताना वर्षाला केवळ २२ कोटी मिळणार असतील तर विकासाला ५० वर्षे लागतील, अशी टीकाही त्यांनी केली.आ. कैलास पाटील यांनी दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारला १७ सप्टेंबरपर्यंतची मुदत देत, त्यानंतर मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशारा दिला.
जिल्ह्यात ७५ टक्के पावसाची तूट असतानाही दुष्काळ जाहीर केला जात नाही. ‘देव देव पाऊस पडेना, देवा भाऊ वीज देईना; शेतकऱ्याने करावे तरी काय?’ असा सवाल त्यांनी केला. पिकांचे पंचनामे, पीकविमा भरपाई, वीज, चारा आणि शेतकरी मदतीवरून त्यांनी सरकारला धारेवर धरले.
आमदार प्रवीण स्वामी यांनी कर्जमाफी, माकणी प्रकल्पाचे कालवे, भूकंपग्रस्त ३७ गावांचा निधी आणि जिल्ह्याच्या अल्प जीडीपीवरून सरकारवर निशाणा साधला. यावेळी जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील, संपर्कप्रमुख सुनील काटमोरे, आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाप्रमुख रणजीत पाटील, सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, ज्येष्ठ नेते संजय निंबाळकर, माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे, युवा सेना जिल्हाप्रमुख रवी वाघमारे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामल वडणे, खलील सय्यद, जावेद काझी, धनंजय राऊत, बालाजी हूबाले, बाळासाहेब मोरे, संजय गजधने, हरिदास शिंदे, गोरोबा झेंडे, अंकुश पेठे, संदीप कदम, धोंडीराम करंजकर, सुधीर गव्हाणे, संतोष वडवले, इमाम शेख, डॉ. रमाकांत वाघमारे, विकास ढवळे, दिगंबर गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.