

Vitthal Bhakti Ras Mahotsav Concludes in the Presence of Hundreds of Thousands of Devotees
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : श्रीक्षेत्र देवगड येथे पुरुषोत्तम मासानिमित्त आयोजित श्री विठ्ठल भक्ती रस महोत्सव व श्रीमद् भागवत कथा सोहळ्याची गुरुवारी (दि. २८) काल्याची दहीहंडी फोडून भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली.
गुरुवर्य महंत भास्करगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आयोजित या सोहळ्यास लाखो भाविकांची उपस्थिती लाभली होती. ज्ञानसागर सभामंडपात झालेल्या काल्याच्या कीर्तनात देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी "साधूंचे जीवन हे जगाच्या कल्याणासाठी तसेच धर्म व राष्ट्राच्या हितासाठी समर्पित असते," असे प्रतिपादन केले. संतांच्या तपश्चर्येमुळे भारतीय संस्कृती जगात र आदर्श ठरल्याचेही त्यांनी सांगितले.
गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांनी तब्बल १४ वर्षांनंतर येथे श्रीमद भागवत कथा सांगत वारकरी संप्रदायाचा भक्तिरस उलगडला. "विठ्ठल माझा माझा..." या भक्तिगीताने भाविकांना भक्तिमय वातावरणात मंत्रमुग्ध केले. राधा हे भक्तीचे तर कृष्ण हे ज्ञानाचे प्रतीक असल्याचा संदेश त्यांनी कथेतून दिला. काल्याच्या कीर्तनात स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांनी भगवान श्रीकृष्णांच्या बाललीलांचे वर्णन करत उपस्थित भाविकांना भक्तिरसात रंगविले.
राष्ट्रसंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज व स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते देवगड महाद्वारावरील दहीहंडी फोडून महोत्सवाची सांगता करण्यात आली. यावेळी महंत श्री कैलासगिरीजी महाराज, महंत श्री रमेशानंदगिरी महाराज, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, महंत अंकुश महाराज जगताप यांच्यासह वारकरी संप्रदायातील संत मंडळी आणि हजारो भाविक उपस्थित होते.
भाविकांच्या गर्दीचा उच्चांक
अधिक मासानिमित्त झालेल्या काल्याच्या कीर्तनाने देवगड येथील सर्व धार्मिक सोहळ्यांचे गर्दीचे विक्रम मोडले. ज्ञानसागर सभामंडप महिला व पुरुष भाविकांनी फुलून गेला होता. अनेक भाविकांनी मंदिर परिसरात झाडाखाली बसून कीर्तनाचा लाभ घेतला. प्रवरा नदीकाठी असलेल्या प्रसादालयात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी अन्नदान करणाऱ्या दात्यांचा सन्मानही करण्यात आला.