

शिऊर : वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथील आदिवासी वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेकडे जाणारा रस्ता अनेक वर्षांपासून अपूर्ण असल्याने पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. पावसामुळे रस्ता चिखलमय झाल्याने विद्यार्थी आणि पालकांना जीव धोक्यात घालून शाळेत ये-जा करावी लागत आहे.
मागील वर्षी सुमारे दीड किलोमीटरच्या रस्त्याच्या कामास सुरुवात झाली होती. मात्र, त्यापैकी केवळ ७०० मीटरपर्यंतच काम पूर्ण झाले. उर्वरित रस्ता अद्याप अपूर्ण असून काम का रखडले, याबाबत ग्रामस्थांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
पूर्ण झालेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे खांदे न भरल्याने वाहनचालकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर उर्वरित कच्चा रस्ता पावसामुळे चिखलमय झाल्याने लहान विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचणे कठीण झाले आहे. अनेक ठिकाणी घसरडा चिखल साचल्याने अपघाताची भीती निर्माण झाली असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आदिवासी वस्तीशाळेकडेजाणारा रस्ता खराब झाला आहे. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतिसाठी रस्तयावर मुरूम टाकून काम पूर्ण करावे.
संजय वाघ, (अध्यक्ष, शालेय समिती )