

छत्रपती संभाजीनगर / पैठण : नगर, नाशिकमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे वरच्या भागातील सर्वच प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे मागील आठवडाभरापासून जायकवाडी धरणात मोठ्याप्रमाणात पाण्याची आवक सुरू असून दोन आठवड्यांत पाणीपातळी ३१ टक्क्यांहून ८० टक्क्यांवर गेली आहे. अजूनही ५० हजार क्युसेक क्षमतेने आवक सुरूच असून जायकवाडी २० भरल्यानंतरच त्यातून विसर्ग सुरू करण्यात येईल, अशी माहिती धरण प्रशासनाकडून सांगण्यात आली आहे.
मराठवाड्यात जून, जुलै दोन महिन्यात केवळ दोन ते तीनवेळाच दमदार पाऊस बरसला आहे. त्यामुळे अजूनही विभागातील लहान व मध्यम प्रकल्पांमध्ये ४० ते ५० टक्क्यांच्या आतच जलसाठा उपलब्ध आहे. तशीच स्थिती जायकवाडी धरणाची असून या पाणलोट क्षेत्रातही केवळ दोनच मुसळधार पाऊस बरसले आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यापर्यंत धरणाची पाणीपातळी ३१ टक्क्यांवर होती. मात्र, नगर, नाशिक जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे येथील सर्व प्रकल्प तुडंब भरले असून त्यातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
नाशिक ते जायकवाडीपर्यंतच्या सर्व प्रकल्पांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक पाणी आहे. त्यामुळे वरच्या बाजूने सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग थेट जायकवाडीत येत आहे. त्यामुळे पाऊस झालेला नसला तरी मराठवाड्याचा तारणहार असलेल्या जायकवाडीची पाणी पातळी दोन आठवड्यांत ८० टक्क्यांवर गेली आहे.
आवक पुढील आठवडाभर अशीच सुरू राहिली. तर जायकवाडीतूनही पाण्याचा विसर्ग सोडण्यात येईल. परंतु, धरणाची पाणीपातळी २० टक्क्यांवर गेल्यावर आणि वरच्या बाजूस पडणाऱ्या पावसाची स्थिती पाहूनच धरणातून विसर्ग सोडण्यात येईल, असे जायकवाडी धरण प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
आवक ५० हजार क्युसेकवर
नगर, नाशिकमधील प्रकल्पातून जायकवाडी धरणाच्या दिशेने मागील दोन आठवड्यांपासून मोठ्याप्रमाणात आवक सुरू आहे. अद्यापही ही आवक सुरूच असून शनिवारी सायंकाळी धरणात ५० हजार क्युसेक क्षमतेने आवक सुरू होती. त्यानुसार चार तासाला धरणाची पाणीपातळी अर्ध्या टक्क्यांची वाढ होत आहे.