

Thirty-five villages in Sillod taluka are supplied with water by tankers
सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील प्रमुख धरणांसह छोट्या-मोठे जलसाठे आटल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. परिणामी तालुक्यातील ३५ गावांना ५१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. धरणे कोरडी पडल्याने धरण उशाला अन् कोरड घशाला, अशी स्थिती तालुक्याची झाली आहे. विशेष म्हणजे तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडूनही केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पाणीबाणी निर्माण झाली आहे.
तालुक्यात मे महिन्यात पाणीटंचाईच्या झळात भर पडली आहे. खेळणा, अजिंठा-अंधारी, चारनेर - पेंडगाव, केळगाव, निल्लोड ही प्रमुख धरणे कोरडी पडली आहे. तर विहिरींनी तळ गाठला आहे. धरणांमधील अवैध पाणी उपस्याकडे प्रशासनाने लक्ष न दिल्याने पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला असून टँकरचे प्रस्ताव दाखल केले जात आहे.
पंचायत समितीकडून पाठपुरावा करीत तातडीने टँकर मंजूर केले जात असल्याने टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळत आहे. तालुक्यातील वांगी बु., चिंचवण, वरुड खुर्द, पिंप्री, बोदवड, सराटी, बोजगाव, मोढा खुर्द, वडोदचाथा, तलवाडा, आसडी, वडोदचाथा वस्ती, वरखेडी भायगाव, पिरोळा- डोईफोडा, गव्हाली, वडाळा, विरगाव, रेलगाव परदेशीवाडी, पिंपळदरी, धावडा, जुनापानेवाडी, पिंपळदरी, धावडा, जुनापानेवाडी, गोळेगाव खु., पानस, घटांब्री, बाळापूर, शिवणा ईदगाहवाडी, अंभई, जांभई, केळगाव, डिग्रस, पानवडोद खुर्द, बहुली, जिवरग टाकळी, रहिमाबाद, कासोद- धामणी, मादणी - वडाळी या गावांना ३५ गावांना टँकरने येथील प्रस्ताव दाखल.
टंचाईग्रस्त गावांना पेंडगाव, लिहाखेडी, आमठाणा, मांडणा, निल्लोड, पालोद, चारनेर, मादणी, खेडी, चिंचपूर येथील विहिरी अधिग्रहण करुन पाणीपुरवठा केला जात आहे. ५१ टँकर १०० फेऱ्या करीत नागरिकांची तहान भागवत आहे.
प्रस्ताव तहसील कार्यालकडे
पंचायत समितीकडे प्राप्त होणारे पाणीपुरवठ्याचे सर्व प्रस्ताव तात्काळ उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालयाकडे पाठवून दोन दिवसांत टँकर मंजूर केले जात आहे. प्रशासनाची भूमिका सकारात्मक असल्याने टंचाईग्रस्त गावांना तातडीने टँकर मंजूर करण्यात येत आहे. ज्या गावात टंचाई असेल अशा गावांनी तातडीने प्रस्ताव दाखल करावे. असे आवाहन सभापती बनकर यांनी केले आहे.