

जरंडी : सोयगाव तालुक्यातील माळेगाव पिंप्री परिसर कायम अवर्षणग््रास्त पट्टा म्हणून ओळखला जात आहे.बारमाही पाण्याच्या कोणत्याही शाश्वत स्रोताअभावी येथील शेतकरी केवळ पावसाळ्यातील चार महिन्यांच्या पावसावर शेती अवलंबून ठेवत आहेत. मोठे कालवे, नद्या किंवा सिंचनाची व्यवस्था नसल्याने या भागातील शेती व्यवसाय संकटात सापडला असून, शासनाने जलसंधारण व सिंचन प्रकल्पांवर विशेष भर द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
एप्रिल-मे महिन्यातच पाझर तलावसह धरण कोरडेठाक पडल्यामुळे माळेगाव पिंप्री गावामध्ये दरवर्षी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होत असते त्यामुळे गावकऱ्यांना व शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
जलाशयेही अरुंद, कमी क्षमतेची
या परिसरात मोठी नदी किंवा कालवा नसल्याने शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावरच शेती करावी लागते. उपलब्ध लहान-मोठी जलाशयेही अरुंद व कमी क्षमतेची असल्याने ती पावसाळ्यानंतर काही महिन्यांत कोरडी पडतात.
परिसरातील धरणाची उंची वाढवून खोलीकरण केल्यास पाणीसाठा वाढण्यास मदत होईल व त्याचा थेट फायदा शेतीला होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या बहुतांश धरणे वर्षभर पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवावी लागत असल्याने रब्बी व उन्हाळी हंगामासाठी पाण्याची मोठी टंचाई जाणवते.परिणामी अनेक शेतकऱ्यांना विहिरीतील मर्यादित पाण्यावर शेती करावी लागते. मात्र ऐन हंगामातच पाण्याची कमतरता भासल्याने पिके धोक्यात येतात.
प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
शासनाने या परिसरात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घ्यावीत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. गावागावातील पाणीसाठे वाढल्यास विहिरी व बोअरवेलची पाणीपातळी वाढून शेतकऱ्यांना बारमाही शेती करणे शक्य होईल. त्यामुळे शेती उत्पादन वाढून आर्थिक समृद्धीचा मार्ग मोकळा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
नदी,कालवे,धरणानाने तळ गाठल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन पावसापूर्वि धरणाचे खोलीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.