

The rush of passengers at railway and bus stations has subsided.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दिवाळी सणाची धामधूम संपली. महाविद्यालये, शाळा सुरू झाल्या. त्यामुळे रेल्वे आणि बसस्थानकांवरील प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात ओसरल्याने चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. दिवाळीनिमित्त सुरु केलेली जादा बससेवा बंद करून नियमित बससेवाच सुरू ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली.
दिवाळीनिमित्त शहरातून जाणाऱ्या आणि शहरात येणाऱ्यांची एकच गर्दी झाल्याने, विविध मार्गावरील रेल्वे, बस हाऊसफुल्ल झाल्या होत्या. प्रवाशांच्या सुविधेसाठी एसटी महामंडळाने विविध मार्गावर जादा बससेवा सुरू केली होती. एसटीप्रमाणेच रेल्वेनांही जादा रेल्वेसह रेल्वेच्या डब्यात वाढ केली आहे. ही सेवा १७ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान देण्यात आली होती.
आता दिवाळी संपली त्याचबरोबर महाविद्यालये, शाळांच्या सुट्या संपल्यामुळे बाहेरगावी गेलेले विद्यार्थी कुटुंबीयांसह आपापल्या गावी परतले आहेत. नियमित बसमधून प्रवासी सेवा दिवाळी व परतीचा हंगाम संपल्याने एसटीने विविध मार्गावर सोडलेल्या जादा बस बंद करून त्या नियमित मार्गावर प्रवासी से-वेसाठी सोडल्या आहेत, तर रेल्वेची जादा रेल्वे सेवा तसेच अधिक डब्यांची सुविधा आणखी काही दिवस राहणार असल्याची माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आली.
ग्रामीण प्रवाशांना दिलासा
दिवाळीमुळे कमी उत्पन्नाच्या मार्गावरील अनेक बसफेऱ्या रद्द केल्या होत्या. याचा सर्वात जास्त फटका ग्रामीण भागातील प्रवाशांना बसला होता. आता दिवाळीचा हंगाम संपताच १ नोव्हेंबरपासून रद्द केलेल्या मार्गावरील बसफेऱ्या पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे ग्रामीण भागातील विविध मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर शाळा सुरू झाल्यानेही दिवाळी सुटीत बंद असलेल्या शाळा बस पुन्हा सुरू करण्यात आल्याने दुर्गम भागातही मुला-मुलींसाठी बस धावताना दिसून येत आहेत. दिवाळीनिमित्त पुणे मार्गावरील बंद करण्यात आलेल्या शिवशाही बस पुन्हा त्या मार्गावर सोडणार का याची उत्सुकता अनेक प्रवाशांना लागली आहे.