

The garbage collection vehicle will reach every home in the city
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : स्वच्छ भारत मिशनच्या टॉपटेनमध्ये येण्यासाठी आज (दि. १) महाराष्ट्र दिनीपासून शहरात महाअभियान सुरू होत आहे. त्यासाठी गुजरात येथील वेस्टर्न इमेजनरी कंपनीला पुढील दहा वर्षांसाठी महापालिकेने कचरा उचलणे आणि शास्त्रोक्त पदध्तीने डेपोपर्यंत नेण्याचे कंत्राट दिले असून, ही कंपनी दररोज शहरातील प्रत्येक वसाहतीतील घरातून डोअर टू डोअर कचरा संकलन करणार आहे.
त्यासाठी ४१२ घंटागाड्या, ५० मिनी ट्रक, ट्रान्सफर स्टेशन ते डेपोपर्यंत कचरा वाहतुकीसाठी ३० कॅप्सूल बनावटीचे कंटेनर लोडर, गल्लींमध्ये जाण्यासाठी ८० हातगाड्या राहणार आहेत, तर त्याद्वारे दररोज ५५० मेट्रिक टन कचरा उचलून शहर चकाचक करण्यात आहे.
३ ट्रान्सफर स्टेशन सज्ज
घराघरांतून आणलेला ओला-सुका वर्गीकृत कचरा एका ठिकाणी जमा करण्यासाठी शहरात पाच ट्रान्सफर स्टेशन उभारण्यात येत आहेत. या प्रत्येक स्टेशनमध्ये प्रत्येकी चार कॅप्सूल कंटेनर व दोन हुकलोडर राहणार आहे. त्याच्या सहाय्याने कचरा डेपोमध्ये नेण्यात येईल. पहिल्या टप्प्यात रमानगर, हडको एन-१२, शिवाजीनगर हे तीन स्टेशन सुरू होणार आहे. उर्वरित चिकलठाणा, कांचनवाडी दुसऱ्या टप्प्यात सुरू होईल.
रोड मॅप तयार
कचरा सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत दोन शिफ्टमध्ये उचलला जाणार आहे. त्यासाठी कंपनीने रोड मॅप तयार केला आहे.
एका घंटागाडीची कचरा साठवण क्षमता ही १२०० ते १४०० किलो इतकी आहे. अशा ४१२ घंटागाड्या असून, त्यातून दररोज सुमारे ५ ते ५.५० लाख किलो कचरा ट्रान्सफर स्टेशनमध्ये येईल.
शहरात ५ लाख २ हजार मालमत्ता आहेत. त्यात ४ लाख ५६ हजार ८०४ निवासी (घरे), ४५ हजार ३७५ व्यवसायिक मालमत्ता आहेत. त्यासाठी दोन शिफ्टमध्ये ४१२ घंटागाड्या कचरा उचलणार आहेत.
लहान गल्लीत घंटागाडी जाणार नाही, त्यासाठी या कमी रुंदीच्या गल्ल्यांतील घरातून कचरा उचलण्यासाठी ८० हातगाड्या आहेत. रस्त्यांवरील ग्रीन वेस्ट, माती, बांधकाम साहित्य उचलण्यासाठी ५० क्लोज मिनी ट्रक आहेत.