The engagement ceremony, expensive gifts, and then a refusal to marry at the last minute.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन करत साखरपुडा, महागड्या भेटवस्तू, पंचतारांकित हॉटेलमधील कार्यक्रम आणि रोख रक्कम असा तब्बल ५० लाखांहून अधिक खर्च करून घेत अखेर ऐनवेळी लग्नास नकार देत सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक व त्यांच्या कुटुंबीयांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
हा प्रकार १९ जा नेवारी २०२५ ते ८ जानेवारी २०२६ या कालावधीत नंदनवन कॉलनी परिसरात घडला. या प्रकरणी प्रकाश मारोतराव टाकळीकर (७१, रा. नंदनवन कॉलनी) यांनी छावणी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून जगदीश मारोतराव लिहीतकर, पत्नी प्रतिभा, मुलगा हर्षल, मुलगी श्वेता आणि जावई ऋषिकेश यशोद (सर्व रा. पुणे) यांच्याविर ोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी प्रकाश टाकळीकर यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, १९ जानेवारी २०२५ रोजी पुणे येथील जगदीश लिहीतकर पत्नी प्रतिभा, मुलगा हर्षल, मुलगी श्वेता आणि जावई ऋषिकेश यशोद हे लग्नाचे स्थळ पाहण्यासाठी शहरात आले होते. स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम व सामाजिकदृष्ट्या प्रभावशाली असल्याचे भासवत त्यांनी टाकळीकर कुटुंबाचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर १२ मे २०२५ रोजी साखरपुडा तर १४ डिसेंबर २०२५ रोजी लग्न ठरले. मात्र याच दरम्यान वरपक्षाकडून महागड्या भेटवस्तू, सोन्याचे दागिने आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये साखरपुड्याचा आग्रह धरत सुमारे १० लाखांचा खर्च करून घेण्यात आला. तसेच नोव्हेंबर २०२५ मध्ये पुण्यातील दोन कोटी रुपयांच्या घरबांधकामासाठी आर्थिक अडचण असल्याचे सांगत ५० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. तडजोडीनंतर २० लाख रुपये रोख देण्यात आले.
त्यानंतरही मागण्या वाढत गेल्या. लग्नपत्रिका छापून वाटप सुरू असतानाच अचानक लग्न स्थगित केल्याचा निरोप वरपक्षाकडून पाठवण्यात आला. त्यावरून राज्य महिला आयोगात तक्रार करण्यात आली. मात्र तेथील तडजोड वरपक्षाने नाकारली. दरम्यान लग्न, साखरपुडा यासाठी रोख रक्कम, सोने, हिऱ्याचे दागिने, हॉटेल व मंगलकार्यालय खर्च मिळून ५० लाख ४८ हजार ९४१ रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक सचिन गाडेकर करीत आहे.