

Teachers' Literary Conference Postponed Again
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने १७मार्च रोजी आयोजित करण्यात आलेले तिसरे शिक्षक साहित्य संमेलन पुन्हा लांबणीवर गेले आहे. शिक्षण विभागाकडून या संमेलनासाठी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची वेळ मिळविण्याचा प्रयत्न सुरू होता.
परंतु मंत्री भुसे यांची वेळ मिळत नसल्याने हे संमेलन लांबणीवर पडल्याचे आता सांगण्यात येत आहे. शिक्षकांच्या साहित्यिक अभिव्यक्तीला व्यासपीठ मिळून देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात शिक्षक संमेलनाची सुरुवात झाली.
या साहित्य संमेलनाचे हे तिसरे वर्ष आहे. मात्र यंदा संमेलनाचे वेळापत्रक दोन वेळा बदलण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे. याआधी हे संमेलन ६ फेब्रुवारी रोजी होणार होते. इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व शाळांच्या अठाराशे शिक्षकांना या संमेलनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. परंतु ऐनवेळी संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर १७ मार्च रोजी संमेलन घेण्याचे ठरले. तशी तयारीही करण्यात आली, परंतु आता पुन्हा एकदा हे संमेलन पुढे ढकलण्यात आले आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांची वेळ न मिळाल्याने हे संमेलन पुढे ढकलल्याचे सूत्रांनी सांगितले.
संमेलनाची तयारी पूर्ण
संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. संजय गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनानिमित्त काढण्यात आलेल्या स्मरणिकेमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा, या विषयावर १२८ शिक्षकांनी लेख दिलेले आहेत. संमेलनाच्या स्वागताध्यक्ष माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर आहेत.
१७ मार्च रोजी एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मंथन सभागृहात हे संमेलन होणार होते. संमेलनासाठी विविध समितींची स्थापना, कार्यवाटप तसेच कार्यक्रमाच्या आराखडा निश्चित करण्यात आलेला आहे.