

Sugar board in all schools to prevent diabetes, Education Department decides
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या नजरेस पडेल अशा ठिकाणी शुगर बोर्ड (साखर फलक) लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. लहान मुलांमधील वाढत्या मधुमेहाच्या (डायबिटीज) समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आरोग्यदायी आहार, साखरेचे मर्यादित सेवन आणि व्यायामाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे.
राज्यात लहान वयोगटातील मुलांमध्ये टाइप २ मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी हा आजार प्रामुख्याने प्रौढांमध्ये आढळत होता, आता तो लहान मुलांमध्ये झपाट्याने वाढत आहे. साखरयुक्त पदार्थ व पेयांचे सहज उपलब्ध असणे, विशेषतः शाळांमधील कॅन्टीन आणि परिसरात विकल्या जाणाऱ्या जंक फूड व कोल्ड्रिंक्स आदी कारणांमुळे हे घडत आहे.
त्यामुळे शिक्षण विभागाने साखर फलकाचा निर्णय घेतला आहे. यात विद्यार्थ्यांना साखरेच्या अति सेवनाचे दुष्परिणाम समजावणारे दृश्यात्मक माहिती फलक असतील. त्यामध्ये दैनंदिन साखरेचे शिफारस केलेले प्रमाण जंक फूड, शीतपेये आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांमधील साखरेचे प्रमाण, अति साखर सेवनामुळे होणारे दुष्परिणाम (स्थूलपणा, दातांचे आजार, मधुमेह), आरोग्यदायी पर्याय आणि संतुलित आहाराचे फायदे याची माहिती दिली जाणार आहे. हे फलक कॅन्टीन, वर्गखोल्या आणि सामान्य क्षेत्रांमध्ये ठळकपणे लावले जाणार आहेत.
शाळामध्ये डॉक्टराची शिबिरे आयोजित केली जातील. तसेच आहारतज्ज्ञ विद्यार्थ्यांना योग्य आहार आणि संतुलित जीवनशैलीचे मार्गदर्शन करतील. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दररोज व्यायाम सत्रे घेण्याचीही योजना आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मधुमेहाची शक्यता लवकर ओळखता येईल.