

अजिंठा : सिल्लोड तालुक्यातील हळदा येथे शेतातील रस्त्याच्या वादातून तुफान हाणामारी झाली. कोयता, कुऱ्हाड व लाकडी काठ्यांनी केलेल्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी अजिंठा पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गंभीर गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
दीपक कौतिक जाधव, गजानन कौतिक जाधव, कौतिक रामचंद्र जाधव, रवींद्र शेषराव जाधव, शेषराव आनंदा जाधव आणि एक महिला (सर्व रा. हळदा, ता. सिल्लोड) यांनी एकत्रित येऊन कैलास मोतीराम जाधव यांच्या घरासमोर जाऊन शिवीगाळ केली. तसेच घराबाहेर येण्यास भाग पाडत धमकावल्याचे नमूद करण्यात आले आहे.
यावेळी कैलास जाधव व त्यांच्या भावाने शिवीगाळ करण्याचे कारण विचारले असता, शेतातून रस्ता का देत नाही, या कारणावरून वाद उफाळून आला. त्यानंतर दीपक, गजानन आणि कौतिक यांनी हातातील कोयता व कुऱ्हाडीने कैलास जाधव तसेच त्यांच्या कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यात डोके, हात व पायावर गंभीर दुखापती झाल्या. तसेच रवींद्र आणि शेषराव यांनी लाकडी काठ्यांनी मारहाण केली, तर महिलेने फिर्यादीच्या आई व पत्नीचे केस ओढून चापट-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हल्ल्यानंतर वरील सर्वांनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना शेतात पुरून टाकण्याची धमकी दिल्याचाही तक्रारीत आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी (दि.2) रात्री अजिंठा पोलिस ठाण्यात सहा आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक पवन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास धम्मदीप काकडे हे करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणी अजिंठा पोलिसांनी पाच आरोपींना सिल्लोड येथील न्यायालयात हजर केले असता आरोपींना 5 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
गंभीर जखमींना छत्रपती संभाजीनगरला हलवले
या घटनेत कैलास मोतीराम जाधव, पत्नी कल्पना जाधव, आई सरुबाई मोतीराम जाधव, आणि भावजय नंदाबाई शंकर जाधव हे गंभीर जखमी झाले आहे. जखमी अवस्थेत नातेवाईकांनी त्यांना सोमवारी (दि. 01) सकाळी तातडीने अजिंठा ग््राामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने चौघांनाही पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.