

छत्रपती संभाजीनगर : शहराच्या विविध भागांत चार जणांनी जीवन संपवलं आहे तर पोलिस भरतीची तयारी करण्यासाठी आलेल्या जालन्याच्या एका १७ वर्षीय मुलाचा खदानीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
देवळाई परिसरात अमोल काकासाहेब लोखंडे (३३, रा. देवळाई) यांनी मंगळवारी (दि.१९) सकाळी साडेनऊच्या सुमारास शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. अमोल हे सकाळी घरून कामासाठी जातो, असे सांगून घराबाहेर पडले होते. त्यानंतर बाळापूर शिवारात त्यांच्या शेतातील एका झाडाला अमोल यांनी गळफास घेतला. अमोल यांचे मामा संतोष हिवाळे शेतात गेले असता त्यांना अमोल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी हा प्रकार ग्रामस्थ व नातेवाइकांना सांगितला. बेशुध्दावस्थेत अमोल यांना घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अमोल यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी असा परिवार आहे. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास जमादार निवृत्ती मदने करत आहेत.
गोलवाडीत तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. ही घटना मंगळवारी (दि.१९) सकाळी साडेदहाच्या सुमारास गोलवाडी भागात उघडकीस आली. अजय तुळजाराम सलामपुरे (३०, रा. गोलवाडी) असे मृताचे नाव आहे.
नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, अजयने सकाळी घरातील वरच्या मजल्यावर जाऊन गळफास घेतला. कुटुंबीयांनी त्याला तात्काळ घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी अजयला तपासून मृत घोषित केले. अजयच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी असा परिवार आहे. या घटनेप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास महिला जमादार राजगुरू करत आहेत.
कौटुंबिक कारणावरून हरसूल भागातील जहांगीर कॉलनीत एका तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. ही घटना सोमवारी (दि.१८) रात्री दहाच्या सुमारास उघडकीस आली. पठाण तय्यब समद (२४, रा. आनंदनगर, मिसारवाडी) असे मृताचे नाव असून, तो खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तय्यब याने सोमवारी जीवन संपवण्यापूर्वी नातेवाईक व त्याच्या मोठ्या भावाला फोन लावून जीवन संपवत असल्याचे सांगितले. त्याचा मोठा भाऊ मिसारवाडीतून हसूलला पोहोचेपर्यंत तय्यबने घरात पत्र्याला लोखंडी पाईपला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला होता. त्याला तात्काळ बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी हरसूल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
न्यायालयातील लिपिकाने गळफास घेऊन जीवन संपवलं आहे, ही घटना मंगळवारी (दि.१९) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास सातारा परिसरात उघडकीस आली. रवींद्र बारकू कापडणीस (५०, रा. संत रोहिदासनगर, सातारा परिसर) असे मृताचे नाव आहे.
पोलिसांनी माहितीनुसार, दिलेल्या कापडणीस हे न्यायालयात लिपिक म्हणून काम करत होते. सोमवारी रात्री रवींद्र हे मुलांचा अभ्यास घे, असे पत्नीला सांगून खोलीत झोपण्यासाठी गेले. सकाळी ते दरवाजा उघडत नसल्याने कुटुंबीयांनी खिडकीतून पाहिले असता रवींद्र यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ घाटीत दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यांच्या जीवन संपवण्याचे कारण समजू शकले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेख करत आहेत.
पोलिस अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय मुलाचा खदानीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.१८) दुपारी एकच्या सुमारास हनुमान टेकडीजवळ असलेल्या खदानीत घडली. सनी राजू चिलका (१७, रा. रामनगर, गांधीनगर) असे मृत मुलाचे नाव असून, तो साई अकादमी येथे निवासी प्रशिक्षण घेत होता.
नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी हा सुमारे अडीच महिन्यांपूर्वी साई अकादमी येथे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेला होता. सोमवारी (दि.18) रोजी सकाळी दहाच्या सुमारास सर्व विद्यार्थ्यांच्या जेवणाची वेळ असते. त्यामुळे सर्वजण जेवण करण्यासाठी गेले होते. मात्र सनी आणि त्याचे चार पाच मित्र मिळून हनुमान टेकडी भागातील खदानीकडे गेले. तिथे सर्वजण पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र पोहोता येत नसल्याने सनी पाण्यात बुडाला. त्याला सायंकाळी सातच्या सुमारास बाहेर काढून बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोपित केले. या घटनेची बेगमपुरा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.