

Kannada city's drinking water problem solved, Kharif crop in full swing
कन्नड (छत्रपती संभाजीगनर): तालुक्यात ऐन उन्हाळ्याच्या मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाली सुरुवातीपासूनच समाधानकारक पावसाने मेहरबानी केली. त्यात श्रावणात जोरदार श्रावण सरी बरसल्याने नदी नाले ओसंडून वाहिले असून तालुक्यात बहुतांश धरणे, पाझर तलाव, सिमेंट बंधारे पूर्ण क्षमतेने भरली असून शिवना टाकळी, अंजना पळशी पाठोपाठ अंबाडी प्रकल्पसुद्धा ओव्हरफ्लो झाल्याने कन्नड शहराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
तालुक्यात यावर्षी पावसाळ्याची सुरुवात एक महिना अगोदर झाल्याने शेती मशागतीस वेळ मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली होती. मात्र या परिस्थितीलाही सामोरे जात शेतकऱ्यांनी तालुक्यात विक्रमी म्हणजे १११.८६ टक्के क्षेत्रावर पेरणी केली. लागणारा उत्पादन खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांची सांगड बसत नसल्याने कापूस पिकाकडे पाठ फिरवित शेतकऱ्यांनी मका पिकाला पसंती दिली. त्याखालोखाल तूर, सोयाबीन पिकाकडे शेतकरी वळला तर कापूस पिकाच्या क्षेत्रात जवळपास ३० टक्क्यांनी घट झाली आहे.
मे लग्नसराई सुरू असतानाच महिन्याच्या आठवड्यापासूनच पहिल्या तालुक्यात पावसाला सुरुवात झाली. मे महिन्यात चांगला पाऊस पडल्यानंतर जून महिन्यात उघडीप पडल्याने शेतीची मशागत करून पेरणी करण्यात आली. जुलै महिन्यात पावसाचा खंड पडल्याने कोरडवाहू आणि माळावरची पिके ऊन धरू लागली होती, मात्र २६ जुलैला पडलेल्या जोरदार पावसाने पिकांना जीवदान मिळाले. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आल्याने धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे.
शहरानजीक असलेल्या अंबाडी प्रकल्प (कै. आप्पासाहेब नागदकर) यातून शहराला पाणीपुरवठा होत असल्याने शहरवासीयांच्या नजरा पावसाळ्यात या प्रकल्पाच्या पाणी साठ्याकडे असतात. हा प्रकल्प जेव्हा पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो होऊन ओसंडून वाहू लागतो त्यावेळी शहरातील महिला, पुरुष, लहान मुलांची प्रकल्पावर पाणी बघण्यासाठी गर्दी होते. हा प्रकल्प सन २०२०, २१, २२ या तीन वर्षांत लगातार १००
टक्के भरून ओव्हरफ्लो झाला होता, मात्र त्यानंतर दोन वर्ष प्रकल्पात पाण्याची वानवा राहिली. तीन वर्षांनंतर प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने शहराच्या नागरिकांत आनंदाचे वातावरण आहे. तर तालुक्यातील सर्वांत मोठा शिवना टाकळी मध्यम प्रकल्पातून ३ दरवाजातून १११५ क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
शिवना टाकळी ९० टक्के (विसर्ग सुरू), अंजना पळशी - १०० टक्के, अंबाडी १०० टक्के, पूर्णा नेवपूर ७०.८३ टक्के, सांतकुंड -४३.५६ टक्के, गौताळा ८२.२७ टक्के, गणेशपूर : ९.६५ टक्के, वाघदरा - १०० टक्के, वडोद ३६.५० टक्के, निंभोरा १०० टक्के, अंबा १०० टक्के, सिरजगाव १०० टक्के, रिठ्ठठी-मोहर्डा २६.५५ टक्के, माटेगाव - ६०.७७ टक्के, खारी खामगाव जोत्याखाली, दे-वळाणा : जोत्याखाली औराळा जोत्याखाली देवगाव रंगारी : जोत्याखाली, मुंगसापूर कोरडा.