

Sambhajinagar Municipal Corporation tops the country in eco-friendly funerals
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने उल्लेखनीय कामगिरी करत महानगरपालिकेने देशपातळीवर वेगळी ओळख निर्माण केली आहे. शहरातील सर्व ३४ स्मशानभूमींमध्ये लाकडाऐवजी पर्यावरणपूरक बायोमास ब्रिकेट्सचा वापर करून अंत्यविधी करणारी छत्रपती संभाजीनगर महापालिका देशातील पहिलीच महापालिका ठरली आहे. गेल्या चार वर्षांपासून महापालिका आणि पंजाब रिन्यूएबल एनर्जी सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम राबवला जात असून आत्तापर्यंत सुमारे साडेनऊ हजार अंत्यविधी बायोमास ब्रिकेटस वर पार पडल्या आहेत.
पर्यावरण संरक्षणाला चालना मिळावी, यासाठी महापालिकेने शहरातील सर्व स्मशानभूमींमध्ये अंत्यविधीसाठी वेस्ट टू एनर्जी ही संकल्पना चार वर्षांपासून अंमलात आणली आहे. यात लाकडाऐवजी पर्यावरणपूरक बायोमास ब्रिकेट्सचा वापर सुरू केला आहे. हा उपक्रम महापालिका आणि पंजाब रिन्यूएबल एनर्जी सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड (पीआरईएसपीएल) यांच्या संयुक्त प्रयत्नातून राबविण्यात येत आहे.
या उपक्रमातंर्गत शहरात आतापर्यंत तब्बल ९५०७ अंत्यविधी बायोमास ब्रिकेट्सवर यशस्विरीत्या करण्यात आले आहेत. त्यामुळे हजारो झाडांची कत्तल टळण्यास मदत झाली आहे. दरम्यान पारंपरिक अंत्यविधीसाठी मोठ्या प्रमाणावर लाकडाचा वापर केला जातो. एका अंत्यविधीसाठी साधारण दोन मोठी झाडे लागतात. मात्र बायोमास ब्रिकेट्सच्या वापरामुळे झाडे तोडण्याचे प्रमाण घटले असून, धूर आणि वायुप्रदूषणावरही नियंत्रण मिळत आहे. तसेच कृषी क्षेत्रातील टाकाऊ अवशेषांपासून तयार होणाऱ्या या ब्रिकेट्समुळे वेस्ट टू एनर्जी संकल्पनेलाही बळ मिळाले आहे.
अंत्यविधीच्या वेळी चंदनाचा सुगंध
या उपक्रमात आता चंदन ब्रिकेट्सचीही भर पडली आहे. अंत्यविधीच्या वेळी चंदनाचा सुगंध अनुभवता यावा यासाठी हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र याबाबत कोणतीही सक्ती नसून, संबंधित कुटुंबाच्या इच्छेनुसार त्याचा वापर केला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या या उपक्रमाची दखल इतर राज्यांतील महापालिकांकडूनही घेतली जात आहे.