

sambhajinagar land fraud case
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वरूड काझी येथील एका ७४ वर्षीय शेतकऱ्याने जमीन विक्री केल्यानंतर खरेदीदाराचे नाव ७/१२ वर येऊ नये यासाठी तिघांनी बोगस इसरपावती, करारनामा तयार करून तलाठी सजा येथे दाखल करून फसवणूक केली. हा प्रकार १ सप्टेंबर २०२२ ते २४ जानेवारी २०२५ याकाळात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रजिस्ट्री कार्यालयात घडला.
नारायण बंडूराव खोसे, अरुण भगवान कोकाटे (दोघेही रा. सिडको एन, २) आणि विजय रंगनाथ पवार (रा. विजयनगर, गारखेडा) अशी फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. फिर्यादी नंदू मुरलीधर मुळे (७४, रा. वरूड काझी, ह. मु, बिडकीन) यांच्या तक्रारीनुसार, त्यांची वरूड काझी शिवारातील गट क्र. १४१ मधील ०.८३ आर जमीन २ डिसेंबर २०२२ रोजी सत्तार खाँ सरदार खाँ आणि नरेश बाळाराम कचकुरे यांना कायदेशीर खरेदीखताद्वारे ९६ लाख ८० हजार रुपयांना विकली होती. या व्यवहाराची रीतसर नोंद होऊन नवीन खरेदीदारांची नावे सातबारा उताऱ्यावर देखील चढवण्यात आली होती.
१६ जानेवारी २०२५ रोजी नवीन मालकांनी (सत्तर खाँ आणि इतर) सदर जमीन पुन्हा तिसऱ्या पक्षाला विकली. या व्यवहाराची नोंद करण्यासाठी जेव्हा ते तलाठी कार्यालयात गेले, तेव्हा त्यांना समजले की, या जमिनीवर नारायण बंडूराव खोसे (रा. सिडको, मुकुंदवाडी) यांनी हरकतीचा अर्ज दाखल केला आहे. खोसे यांनी असा दावा केला आहे की, मुळे यांनी त्यांच्यासोबत १ सप्टेंबर २०२२ रोजी १ कोटी ३ लाख ७५ हजार रुपयांचा विक्री करार केला असून २० लाख रुपये इसारपोटी घेतले आहेत.
हा प्रकार पाहून मुळे यांना धक्काच बसला. त्यांनी छायांकित प्रति मिळविल्या. तक्रारदार नंदू मुळे यांनी तक्रारीनुसार, त्यांनी आरोपी नारायण खोसे किंवा करारावर साक्षीदार म्हणून असलेल्या अरुण कोकाटे आणि विजय पवार यांना कधीही पाहिलेले नाही. खोसे यांनी सादर केलेली इसारपावती (दस्त क्र. ५२०९/२०२२) पूर्णपणे बनावट असून त्यावर मुळे यांची खोटी सही करण्यात आली आहे.
मी आजवर कोणत्याही कोऱ्या बाँडवर सही केलेली नाही आणि असा कोणताही व्यवहार केलेला नाही, असे मुळे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. बनावट कागदपत्रे आणि तक्रार अर्ज सध्या ग्रामीण तहसीलदार, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे वर्ग केल्याचेही म्हटले आहे. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक भागवत मुठाळ करत आहेत.