

Sambhajinagar is among the 100 districts in the country in terms of deaths in accidents.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रस्ते अपघातात दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत असे. सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या देशातील १०० जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगरचा समावेश झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात रस्ते अपघातांतील मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. त्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बुधवारी (दि.८) दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक पार पडली. बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, पोलीस उपायुक्त वाहतुक शर्मिष्ठछा वालावलकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लड्नु, अधीक्षक अभियंता एस. एस. भगत, कार्यकारी अभियंता शेषराव चव्हाण आदी अधिकारी उपस्थित होते.
भारत सरकारच्या रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालयाने शून्य अपघाती मृत्यू जिल्हा या उपक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची निवड केली आहे. जिल्ह्यात रस्त्यावर होणाऱ्या अपघातांमध्ये मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी प्रभावी उपाययोजना राबवाव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या बैठकीत दिले.
चालू वर्षात जिल्ह्यात ४०३ जणांचा मृत्यू रस्ते अपघात आणि त्यातील मृत्यूबाबत बैठकीत माहिती देण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात २०२४ मध्ये ३७३ अपघात होऊन त्यात ४६८ मृत्यू झाले. तर चालू वर्षात म्हणजे २०२५ मध्ये ४०३ अपघातात ५०८ जणांचे मृत्यू झाले आहेत. अपघात टाळता यावे यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे व अपघातानंतर जखमींना तात्काळ उपचार सुविधा उपलब्ध करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.
जिल्ह्यात एकूण ६६ अपघातप्रवण स्थळे आहेत. या स्थळांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना जसे आवश्यक अभियांत्रिकी बदल, सूचना, दिशा फलक लावणे, नजीकच्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणे इत्यादी उपाययोजना राबविण्यासाठी ९ कोटी रुपयांचा आराखडाही परिवहन विभागाने बुधवारी सादर केला.