

Sambhajinagar Encroachment Road works should not be started without payment
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेने धडक कारवाई करीत आठ रस्त्यांवरील मालमत्तांवर बुलडोजर चालवले. यात साडेचार हजारांवर मालमत्ता जमीनदोस्त करण्यात आल्या. या कारवाईला महिना उलटला, मात्र अद्यापही रस्त्याच्या मार्किंगचे कामही सुरू झालेले नसल्याने मालमत्ताधारकानी संताप मोबदला मिळाल्याशिवाय रस्त्यांची कामे सुरू करू नयेत, अशी भूमिका घेतली आहे.
नवीन शहर विकास आराखड्यानुसार महापालिकेकडून पाडापाडी मोहिमेला जुनपासून सुरुवात करण्यात आली. यात बीड बायपास सर्व्हिस रोडवरील मालमत्ता पाडण्यात आल्या. त्यानंतर मुकुंदवाडी, चिकलठाणा, पैठण रोड, पडेगाव-मिटमिटा, दिल्लीगेट रोड, जळगाव रोड, रेल्वेस्टेशन, महावीर चौक ते सेव्हनहिलपर्यंतंच्या मालमत्तांची पाडापाडी करण्यात आली.
या आठ मार्गावरील गार गरीबांच्या साडे चार हजार मालमत्ता जमीनदोस्त करण्यात आल्या. या कारवाईला महिना उलटला तरी अद्याप रस्त्याच्या मार्किंगचे काम सुरु करण्यात आलेले नाही. त्यामुळे मालमत्ता धारक संतप्त झाले असून मोबदला मिळाल्याशिवाय रस्त्यांची कामे सुरू करू नयेत, अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान पाडपाडीनंतर रस्त्यांची कामे लवकर सुरू होतील, अशी अपेक्षा होती. मात्र महापालिकेने अद्याप कोणतीही प्रक्रिया सुरू केलेली मनपाचे पथक या भागांकडे फिरकलेलेही नाहीत. त्यामुळे मनपाकडून रस्ता कामाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
आरोग्याला धोकादायक मलबा रस्त्यावरच
नागरिकांनी लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या दोन मजली, तीन मजली इमारती महापालिकेने जमीनदोस्त केल्या. मात्र महापालिकेकडून हा मलबा अद्यापही उचलण्यात आलेला नाही. आरोग्याला धोका होत असल्याने काही ठिकाणी नागरिकांनी स्वतःहून मलबा उचलून घेतला. मात्र अनेक ठिकाणी अद्यापही मलबा तसाच पडून असल्याने मनपाने याकडे गांभीर्यान लक्ष देऊन मलबा उचलून घ्यावा अशी मागणी केली जात आहे.
पंचनाम्यासाठी पथकाची प्रतीक्षा
महापालिकेने पाडापाडी करताना पंचनामे केले नव्हते. या कारवाईनंतर प्रशासक जी. श्रीकांत यांनी पंचनाम्यांचे आदेश दिले. त्यानंतरही अद्याप पंचनाम्यालाही सुरुवात झालेली नसल्याने पाडापाडी करून गेलेले मनपा प्रशासन अद्यापही फिरकले नसल्याने नागरिक या पथकाच्या प्रतीक्षेत आहेत.