

Railway building collapses; Passengers are disturbed by dust
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नुकतेच रेल्वेची मुख्य इमारत पाडण्याचे काम वेगाने सुरू आहे. इमारत पाडापाडीच्या कामांमुळे रेल्-वेस्थानकावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. अशा धुळीतच प्रवाशांना रेल्वेची प्रतीक्षा करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.
जुने रेल्वेस्थानक व मुख्य इमारत पाडून त्या ठिकाणी अत्याधुनिक असे रेल्वेस्थानक बनवण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या नवीन इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच रेल्वेस्थानकाची मुख्य इमारत पाडणे सुरू केले आहे. ते काम वेगाने सुरू आहे.
दरम्यान, ही पाडापाडी करताना रेल्वेस्थानकासह परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ पसरत आहे. या धुळीपासून रक्षण करण्यासाठी इमारत पाडण्याआधीच काही उपाययोजना न केल्यामुळे प्रवाशांना नाक धरूनच रेल्वेची प्रतीक्षा करावी लागत आहे. रेल्वे प्रशासनाच्या या हलगर्जीपणावर प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
नांदेडला संपर्क साधा याबाबत रेल्वेच्या बांधकाम विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. एरव्ही कोणत्याही प्रकारची माहिती विचारल्यास नांदेड कार्यालयाशी संपर्क साधा, असे सांगून येथील अधिकारी हाथ झटकतात त्यामुळेही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
प्रवाशांच्या असुविधेकड दुर्लक्ष
रेल्वेस्थानकावर केवळ धुळीचाच नाही पाणी, स्वच्छताग्रह आदींच्या असुविधांमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. इमारत पाडताना उडणाऱ्या धुळीबाबत आगोदरच निर्णय घेतला नसल्याने आता रेल्-वेस्थानकासह परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. थंडीच्या वातावरणांत अंगावर धुळीचा थर साचत असल्याने अनेकांनी त्वचेच्या विकाराचा सामना करावा लागत आहे. ही असुविधा रेल्वे अधिकाऱ्यांच्या नजरेत येत असतांनाही त्यावर उपाययोजना करण्याऐवजी ते दुर्लक्ष करत असल्याने प्रवाशांत नाराजीचा सूर दिसून येत आहे.