

Power Outage in the Waluj Area
वाळूज, पुढारी वृत्तसेवा : नारायणपूर परिसरातील एजी (शेती) पंपांच्या वीजपुरवठ्यात सातत्याने खंड पडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांवर गंभीर परिणाम होत आहे. सध्या उन्हाची तीव्रता कमालीची वाढली असून, पाण्याअभावी शेतातील पिके करपू लागली आहेत. या त्रासाला कंटाळून संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी (दि. २१) वाळूज येथील महावितरण कार्यालयात धाव घेत उपअभियंता साळवे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.
नारायणपूर परिसरातील शेतकऱ्यांना शेती पंपासाठी नियमित आणि पुरेशा वेळेचा वीजपुरवठा मिळत नसल्याची मुख्य तक्रार आहे. वारंवार वीज खंडित होत असल्याने पिकांना वेळेवर पाणी देणे अशक्य झाले आहे. यामुळे शेतातील मका, भाजीपाला, ऊस तसेच इतर हंगामी पिके पूर्णपणे वाळण्याच्या मार्गावर असल्याचे शेतकऱ्यांनी निवेदनात नमूद केले.
सध्याच्या कडक उन्हाचा विचार करता, महावितरणने दिवसा किमान ८ तास आणि रात्री १० तास अखंडित वीजपुरवठा करावा, अशी प्रमुख मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याचसोबत कमी दाबाने (लो व्होल्टेज) होणारा वीजपुरवठा आणि अचानक होणारे ट्रिपिंग तातडीने बंद करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली.
या निवेदनावर अशोक काकडे, रूपचंद कसुरे, संजय भुजंग, भीमराव करडे, शंकर फांदाडे, सचिन सुरासे, नवनाथ करडे, प्रभाकर फांदाडे, रमेश भुजंग, अक्षय राजपूत, रतिलाल राजपूत यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.