

On one hand, a shortage; on the other, the wastage of thousands of units of blood
राहुल जांगडे
छत्रपती संभाजीनगर : एकीकडे गरजू रुग्णांसाठी रक्त्त मिळत नाही, वारंवार रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. अशी विदारक स्थिती असताना दुसरीकडे दरवर्षी हजारो रक्त पिशव्या अक्षरशः कचऱ्यात फेकल्या जात असल्याचे वास्तव आहे. राज्यातील ७७शासकीय रक्तकेंद्रांच्या माध्यमातून २०२५ मध्ये तब्बल ३ लाख ९३ हजार युनिट रक्ताचे संकलन करण्यात आले. मात्र दुर्दैवाने यापैकी १५ हजार ५२१ युनिट रक्त विविध कारणांमुळे नष्ट करावे लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
रक्तदान हेच सर्वोत्कृष्ट दान, अशी भावना उराशी बाळगून राज्यभरात दररोज तरुण-तरुणींपासून ते ज्येष्ठांपर्यंत हजारो दाते रक्तदान करतात. एका दात्याचे रक्तदान तीन ते चार जणांचे प्राण वाचू शकते, याची जाणीव असलेले शेकडो दाते दर चार महिन्यांनी स्वतःहून रक्तदान करतात. मात्र दात्यांच्या शरीरातून थेंब थेंब काढलेल्या अमूल्य रक्ताची कालबाह्यता, रक्तसंक्रमण यासह विविध तांत्रिक कारणाने नासाडी होते.
अपघातातील रुग्ण, यॅलेसेमियाग्रस्त बालके आणि गंभीर आजारांशी झुंजणाऱ्या रुग्णांसाठी रक्ताचा तुटवडा भासू नये, या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. संकलित रक्त गरजू रुग्णांसाठी उपयोगी पडावे यासाठी रक्तपेढी चालक, कर्मचाऱ्यांकडून पुरेपूर प्रयत्न करूनही दुर्दैवाने दरवर्षी एकूण रक्तसंकलनापैकी १ ते ३ टक्क्यांपर्यंत युनिट रक्त विविध कारणांमुळे नष्ट करावे लागते.
रक्त वाया जाण्याचे प्रमाण १.६३ टक्के राज्यात गतवर्षी संकलित एकूण रक्तापैकी ९ हजार ७८ युनिट रक्त हे दूषित व इतर तांत्रिक कारणांमुळे वापरण्यायोग्य नव्हते. तर ६ हजार ४४३ युनिट रक्त हे मुदतबाह्य झाल्याने वाया गेले आहे. कालबाह्यतेमुळे रक्त वाया जाण्याचे प्रमाण १.६३ टक्के असून, हे प्रमाण केंद्र सरकारच्या ४ टक्क्यांच्या कमाल मार्गदर्शक मानकांपेक्षा कमी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
नवीन रक्तपिशव्यांमुळे रक्ताची सर्वसाधारण आयुमर्यादा ३५ दिवसांवरून ४२ दिवसांपर्यंत वाढली आहे. त्यावरही रक्ताची एक्सपायरी डेट जवळ येण्याच्या आठवडाभर आधीच विविध रक्तपेढ्या एकमेकांच्या संपर्कात राहून ते रक्त रुग्णांच्या उपयोगी पडावे, असे नियोजन करतो. तरी विविध तांत्रिक कारणांनी रक्त वाया जाण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. प्रत्येक दात्याने केलेल्या रक्तदानाचा आदर करतो, लायन्स रक्तपेढीचे शामराव सोनवणे यांनी सांगितले.