

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टी व सततच्य पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या महापुरात अनेक गावे, शेतपिके, रस्ते, पूल आणि वीज वाहिन्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. हातचे पीक, गुरेढोरे आणि दुभती जनावरे वाहून गेल्याने शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. या भीषण परिस्थितीची गंभीर दखल घेत आमदार अब्दुल सत्तार यांनी बुधवारी सकाळीच भरपावसात शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून त्यांना धीर दिला. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आ. सत्तार म्हणाले, ङ्गङ्घ महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून अहवाल शासनाला सादर करावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नुकसानभरपाईसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काळजी करू नका, हे संकट आपण सर्वांनी एकजुटीने दूर करायचे आहे.
यावेळी त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार सतीश सोनी, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव, तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप, जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंता राजधर दांडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी यशपाल दिलपाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता विजय सोनवणे, शाखा अभियंता वसीम देशमुख, वीज वितरण विभागाचे उपविभागीय अभियंता प्रदीप काळे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अशोक शाखावार, जिल्हा परिषद सिंचन विभागाचे अनिल मुंगीकर आदी अधिकारी उपस्थित होते.
तसेच जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, शिव-सेना तालुकाप्रमुख केशवराव तायडे, शहरप्रमुख मनोज झवर, बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे, उपसभापती संदीप राऊत, जिपचे माजी अध्यक्ष श्रीराम पा. महाजन, माजी उपसभापती सय्यद अजिज बागवान, बाजार समितीचे माजी सभापती रामदास पालोदकर, माजी उपनगराध्यक्ष नंदकिशोर सहारे, सरपंच रविसिंग राजपूत, डॉ. संजय जामकर, नानासाहेब रहाटे, नरेंद्र (बापू) पाटील, शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ, प्रशांत क्षीरसागर, राजू गौर, सुधाकर पाटील, हनिफ मुलतानी, रवी राजपूत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. अब्दुल सत्तार म्हणाले की, ङ्गङ्घशेतकरी व गावकरी यांनी धीर धरण्याची गरज आहे. अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे, रस्त्यांचे, पुलांचे, वीज वाहिन्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. साथीचे रोग पसरू नयेत यासाठी आरोग्य विभाग व पशुसंवर्धन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात. पशुधन वाचवण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात यावी. प्रशासनाने वस्तुनिष्ठ पंचनामे करीत कोणतीही शेतकरी कुटुंब वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
आ. अब्दुल सत्तार यांनी आमठाणा, पेंडगाव, देऊळगाव बाजार, चारनेर, चिंचवण, घाटनांद्रा, धावडा, बोरगाव सारवणी, बोरगाव बाजार, सावखेडा खुर्द, सावखेडा बुद्रुक आदी गावांमध्ये भेट देऊन थेट शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.