

वैजापूर : तालुक्यातील खंडाळा येथे नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि.१९) घडली. सूरज सुभाष शिंदे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. नीट परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक पोलिस तपासात समोर आले आहे.
सूरज हा घरीच नीट परीक्षेची तयारी करीत होता. जीवन संपवण्यापूर्वी त्याने दोन ओळींची चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये, ‘सॉरी, आई आणि अप्पा, नक्कीच पुढच्या जन्मी तुमच्यासाठी डॉक्टर बनेल. काळजी घ्या आणि आनंदी राहा,’ असा मजकूर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गावात सप्ताह सुरू असल्याने घटनेच्यावेळी कुटुंबातील सदस्य घराबाहेर गेले होते. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांनी सूरजला फोन केला. मात्र, त्याचा फोन बंद असल्याचे आढळले. त्यानंतर त्याच्या लहान बहिणीने वरच्या खोलीत जाऊन पाहिले असता सूरज गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तिच्या आरडाओरडीनंतर कुटुंबीयांनी तातडीने धाव घेतली.
सूरजला तातडीने वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.