

छत्रपती संभाजीनगर : शैक्षणिक वर्ष सुरू होऊन जवळपास तीन महिने उलटल्यानंतर महापालिकेच्या नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या हाती अखेर नवीन पाठ्यपुस्तके पडली आहेत. बालभारतीकडे सुरुवातीला नवीन पुस्तके उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना गतवर्षीची पुस्तके देऊन अभ्यासक्रम सुरू ठेवण्यात आला होता. शनिवारी (दि. २२) नवीन पुस्तके उपलब्ध होताच महापालिका शिक्षण विभागाने ती तातडीने ताब्यात घेत सर्व १७ माध्यमिक शाळांमध्ये वितरित केली.
महापालिकेच्या शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत पाठ्यपुस्तकांचा पुरवठा केला जातो. मात्र, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची खरेदी महापालिकेच्या निधीतून करण्यात येते. यंदा शैक्षणिक सत्र सुरू झाले, तरी बालभारतीकडे नववी-दहावीच्या नवीन पुस्तकांचा पुरवठा उपलब्ध झाला नव्हता. विद्यार्थ्यांचा अभ्यास खोळंबू नये म्हणून शिक्षण विभागाने शाळा सुरू होताच गतवर्षीची पुस्तके उपलब्ध करून दिली होती.
दरम्यान, २२ ऑगस्टला बालभारतीकडे नवीन पुस्तके दाखल झाली. त्याची माहिती मिळताच शिक्षण विभागाने विलंब न करता पुस्तके ताब्यात घेतली आणि मनपाच्या सर्व १७ माध्यमिक शाळांकडे पाठविली. त्यामुळे नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना आता नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके उपलब्ध झाली असून, जुन्या पुस्तकांवर सुरू असलेला अभ्यास अखेर थांबला आहे. महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या आदेशानुसार उपायुक्त तथा शिक्षण विभागप्रमुख अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुस्तकांचे वितरण करण्यात आली.
मनपाच्या १७ शाळांना नवीन पुस्तके
१७ : मनपाच्या माध्यमिक शाळा
९वी-१०वी : विद्यार्थ्यांसाठी पुस्तके
२२ ऑगस्ट : बालभारतीकडे पुस्तके उपलब्ध
तातडीने वितरण : सर्व शाळांमध्ये पुस्तकांचा पुरवठा
जुनी पुस्तके : नवीन पुस्तके येईपर्यंत तात्पुरता वापर