

Marathwada got its first Chief Minister's post because of Indira Gandhi
छत्रपती संभाजीनगर :
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी (दि. ३१) जवळ आल्यानंतर इंदिराजींच्या मराठवाड्याशी असलेल्या अनेक आठवणी डोळ्यासमोर येतात. इंदिराजींनी मनावर घेतल्यामुळेच शंकरराव चव्हाण यांच्या रुपाने मराठवाड्याला पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद मिळाले. तसेच उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ होण्यासाठी त्यांनी मान्यता दिली. जायकवाडी धरणाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते झाले होते. शहरातील सिडको वसहतीची निर्मिती होत असताना वसाहतीला भेट देऊन योजनाही समजावून घेतली होती.
हेलिकाॕप्टर भरकटले
सूर्यकांता पाटील आमदार कशा झाल्या? याचीही एक स्टोरी आहे. आणीबाणी उठल्यानंतर इंदिरा गांधी पराभूत झाल्या होत्या. त्यानंतरच्या काळात त्यांचा एक कार्यक्रम नांदेडला आयोजित करण्यात आला होता. पण इंदिराजींचे हेलिकॉप्टर भरकटले व ते वसमतला उतरले. तेथे स्थानिक नेते मुंजाजीराव जाधव यांनी त्यांचे स्वागत केले. तोपर्यंत सूर्यकांता पाटील कारने वसमत येथे दाखल झाल्या. त्या इंदिराजींना नांदेड येथे विश्रामगृहावर घेऊन गेल्या. तेथे गेल्यावर इंदिराजींना फ्रेश व्हायचे होते. त्यावेळी इंदिराजींनी त्यांना साडी मागितली. सूर्यकांताबाईंनी तातडीने साड्या आणल्यावर ‘मै ऐसे साडी पहनती हूँ क्या,’ असे इंदिराजी म्हणाल्या. ‘तू ऐसा कर...बाहर जा.. मै नहाती हूँ.. साडी सुखाने के लिए मेरी मदद कर,’ असे त्या सूर्यकांता यांना म्हणाल्या. त्यानंतर दरवाजा बंद करून इंदिराजी फ्रेश झाल्या व त्यांनी साडी धुतली. त्यानंतर खोलीतील पंख्याचा स्पिड वाढवून सूर्यकांता व त्यांनी साडी वाळविली. हा प्रसंग लक्षात ठेवत इंदिरा गांधी यांनी नंतरच्या विधानसभा निवडणुकीत सूर्यकांता पाटील यांना हदगाव तर मुंजाजीराव जाधवांना वसमतमधून उमेदवारी दिली. पहिल्यांदा तू विधानसभा लढव, मग लोकसभेचे बघू, असा सल्ल्ला त्यांनी दिला.
इंदिराजींनी पेन्सिल आपटली
1984 पूर्वी पंतप्रधान व अन्य नेत्यांना भेटणे फारसे अवघड नव्हते. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी व अन्य नेत्यांशी बीडच्या खासदार केशरकाकूंची जवळीक होती. केशरकाकूंच्या झालेल्या एका सभेला व्यासपीठावर इंदिराजी, केशरकाकू आणि प्रेमलाताई चव्हाण तिन्ही महिलाच होत्या. एकदा साखर कारखाना उभारणीला परवानगी मिळावी म्हणून केशरकाकू इंदिराजींकडे गेल्या होत्या. तेव्हा इंदिराजी घाईगडबडीत होत्या, त्यांनी टेबलावर पेन्सिल आपटली आणि त्या काकूंना म्हणाल्या, जल्दी बोलो मुझे बाहर जाना है. काकू म्हणाल्या, ‘आपने पेन्सिल टेबलपर पट्क दी, मैं डर गई हूं. मैं अभी नहीं कह सकती. मुझे हिन्दी अभी आती नहीं.’. नंतर त्या जेव्हा इंदिराजींना भेटल्या तेव्हा त्यांची कारखाना काढण्याची मानसिकता पाहून इंदिराजीही चकित झाल्या. महिला नेत्या साखर कारखाना कसा काय काढू शकतात?, असा प्रश्न इंदिराजींसमोर होता, पण काकूंनी त्यांच्या मनातील शंका दूर केली. दुसर्या भेटीत बीड दूरदर्शन केंद्र त्यांनी मंजूर करून आणले होते हे विशेष.