

ठळक मुद्दे
जालना वगळता सात जिल्ह्यांतील तब्बल 3 लाख 58 हजार हेक्टर पिके भुईसपाट
मराठवाड्यात पावसाचा अक्षरश: धुमाकूळ; बाधित गावांची संख्याही 1154
एकट्या नांदेड जिल्ह्यात 2 लाख 59 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
In the remaining seven districts, excluding Jalna, a whopping 3 lakh 58 thousand hectares, or about 9 lakh acres, are under cultivation.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात 14 ते 17 ऑगस्टदरम्यान झालेल्या सलग पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जालना वगळता उर्वरित सात जिल्ह्यांतील तब्बल 3 लाख 58 हजार हेक्टर म्हणजे सुमारे 9 लाख एकरवरील पिके भुईसपाट झाली आहेत. तर मृतांचा आकडाही सहा वरून अकरावर पोहोचला आहे. याशिवाय पावसामुळे तब्बल 588 घरांची पडझड झाली आहेत. बाधित गावांची संख्याही 1154 इतकी झाली आहे.
श्रावण महिन्याच्या शेवटी मराठवाड्यात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. 14 ऑगस्टपासून नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यांमधील अनेक गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. महसूल विभागाकडून या नुकसानीची प्राथमिक आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार गेल्या तीन दिवसांत मराठवाड्यात 1154 गावे बाधित झाली आहेत. तसेच विभागातील सात जिल्ह्यांतील 3 लाख 58 हजार हेक्टरवरील पिके पावसामुळे नष्ट झाली. एकट्या नांदेड जिल्ह्यात 2 लाख 59 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर हिंगोली जिल्ह्यातील 56 हजार, लातूर जिल्ह्यातील 20 हजार हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत.
नुकसानीचे क्षेत्र
जिरायती : 3 लाख 50 हजार हेक्टर
बागायत : 8168 हेक्टर
फळपीक : 198 हेक्टर
मराठवाड्यात पावसामुळे सहा जणांचा जीव गेल्याची आकडेवारी सोमवारी समोर आली होती. परंतु आता ही संख्या अकरावर पोहोचली आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक 7 जण, बीड जिल्ह्यात 2 आणि हिंगोली जिल्ह्यात 2 जणांना जीव गमवावा लागला आहे. यासोबत लहान मोठी 498 जनावरेही मृत्युमुखी पडली आहेत. पावसामुळे घरांचीही मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. महसूलच्या आकडेवारीनुसार विभागात 561 कच्च्या घरांची, 21 पक्क्या घरांची, 2 झोपड्यांची आणि 4 गोठ्ठ्यांची पडझड झाली आहे.