

छत्रपती संभाजीनगर : जागतिक घडामोडींचा फटका आता थेट सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. शहरात मोठ्या संख्येने धावणाऱ्या एलपीजी रिक्षांच्या इंधन दरात सोमवारी (दि.९) एकाच दिवसात १३ रुपयांची मोठी वाढ झाली आहे. कालपर्यंत ६२ रुपये प्रतिलिटर मिळणारा गॅस आता ७५ रुपयांवर पोहोचला असून, यामुळे शहरातील रिक्षा प्रवास महागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या सुरू असलेल्या इराण-इस्रायल युद्धामुळे कच्च्या तेलासह गॅसच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. परिणामी, शहरातील गॅस पंपांवर रिक्षाचालकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तासन् तास रांगेत उभे राहूनही गॅस मिळत नसल्याने रिक्षाचालकांची मोठी धावपळ सुरू आहे. गॅसच्या दरात अचानक झालेली ही वाढ आणि संभाव्य तुटवडा यामुळे रिक्षाचालक हवालदिल झाले आहेत.
२५ हजार रिक्षाचालकांसमोर पेच जिल्ह्यात एकूण ३२ हजार रिक्षा असून, त्यापैकी सुमारे २५ हजारांहून अधिक रिक्षा या केवळ एलपीजी इंधनावर चालतात. सीएनजी आणि पेट्रोलवर चालणाऱ्या रिक्षांची संख्या तुलनेने कमी आहे. इंधनाचे दर गगनाला भिडल्यामुळे जुन्या दराने प्रवाशांची ने-आण करणे आता परवडणारे नसल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. अधिकृत दरवाढीची परवानगी नसल्याने अनेक चालकांनी तर रिक्षा घराबाहेर न काढण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा रिक्षा स्टँडवर रंगली आहे.
दर आणखी वाढण्याचे संकेत
शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून गॅसचा तुटवडा जाणवत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने गॅस पंपधारकांनी येणाऱ्या दिवसांत किमतीत आणखी वाढ होण्याचे संकेत दिले आहेत. जर हा तुटवडा असाच राहिला, तर रिक्षा भाड्यात वाढ करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा पवित्रा रिक्षा संघटनांनी घेतला आहे. याचा थेट फटका रोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, चाकरमानी आणि सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे.
जिल्ह्यात एलपीजीचे १८ पंप
शहरात दिवसेंदिवस एलपीजी रिक्षांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर पंपाचीही संख्या वाढत आहे. आजघडीला जिल्ह्यात १८ एलपीजेचे पंप असून, सीएनजीचे ४ पंप आहेत. दरम्यान, वाढत्या रिक्षांमुळे येणाऱ्या काळात या पंपाचीही संख्या वाढण्याची शक्यता आहे.
शहरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून गॅसचा तुटवडा जाणवत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने गॅस पंपधारकांनी येणाऱ्या दिवसांत किमतीत आणखी वाढ होण्याचे संकेत दिले आहेत. जर हा तुटवडा असाच राहिला, तर रिक्षा भाड्यात वाढ करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा पवित्रा रिक्षा संघटनांनी घेतला आहे. याचा थेट फटका रोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, चाकरमानी आणि सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे.