

छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जायकवाडी धरणात उभारण्यात आलेल्या जॅकवेलच्या गेट्सची गळती आणि अॅप्रोच ब्रीजवरील काँक्रीट चेअरबेड्सचे तडे तातडीने दुरुस्त करा, असे आदेश न्यायालयीन समितीने महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला (एमजेपी) आणि कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीला अडीच महिन्यांपूर्वीच दिले आहेत. परंतु, अद्यापही या दुरुस्तीचे काम झालेले नाही. मात्र, असतानाही प्रशासन नव्या जलवाहिनीतून शहराला पाणी देण्याचीच घाई करीत आहे. त्यामुळे २७४० कोटी खर्चाची संपूर्ण योजना अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शहरवासीयांना दररोज नियमितपणे नळाद्वारे पाणीपुरवठा व्हावा, यासाठी २७४० कोटी रुपये खर्चुन नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम करण्यात येत आहे.सध्या हे काम अंतिम टप्प्यात असून शेवटचा टप्पाच प्रशासनासाठी मोठे डोखेदुखी बनला आहे. त्यात उच्च न्यायालयाच्या आदेशाने न्यायालयीन समितीसह महापालिका आयुक्तांनी वारंवार आदेश देऊनही कंत्राटदार कंपनी मनुष्यबळ वाढविण्यास तयार नाही.
त्यामुळे मागील अडीच ते तीन महिन्यांपूर्वी न्यायालयीन समितीने जॅकवेलसोबतच धरणातील पाणी योजनेच्या विविध कामांची पाहणी करून ज्या ज्या त्रुट्यांची पूर्तता करण्याचे आदेश दिले होते. त्यातील सुमारे ४० ते ५० टक्के त्रुट्या अद्यापही जैसे थेच असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यातील महत्त्वाचे म्हणजे जॅकवेलच्या गेटला लागलेली गळती सध्या गंभीर मुद्दा बनला आहे. दरम्यान, एक-दोन नव्हे तर सर्वच गेट्सला ही गळती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
यातील काही गेटमधून मोठ्याप्रमाणात पाणी जॅकवेलबाहेर पडत आहे. सध्या जॅकवेलमध्ये सायफन पद्धतीने पाणी घेतले जात आहे. परंतु, पहिल्या टप्प्यानंतर येत्या सहा महिन्यांत दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण करून योजना शंभर टक्के कार्यान्वित केली जाणार आहे. तेव्हा जॅकवेलसाठी उभारण्यात आलेला मातीचा कॉफर्ड डॅम काढण्यात येईल. ज्यामुळे जॅकवेल पूर्णतः पाण्याखाली येईल आणि त्याचवेळी या गेट्सचा उपयोग होणार आहे.
जॅकवेलची खोली २७ मीटर आहे. त्यानुसार तीन स्तरावर गेट्स देण्यात आले आहेत. सर्वात उंचावर एक दुसरा मध्यभागी आणि तिसरा त्याखाली २३ मीटरवर आहे. यात सर्वात खाली असलेल्या गेट्सलाच मोठ्याप्रमाणात भगदाड पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे गेट्सचे काम योग्यरीत्या न झाल्याने कॉफर्ड डॅम काढल्यानंतर भविष्यात महापालिकेला मडपंपा लावूनही गाळ काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल, असेही सूत्रांनी सांगितले.
जलवाहिनीही संकटात
जॅकवेलमधून पंपिंग करून पाण्याची उचल केली जाणार आहे. हे पाणी वाहून नेण्यासाठी अॅप्रोच ब्रीज तयार करून त्यावरून जलवाहिनी टाकली आहे. या जलवाहिनीच्या सपोर्टसाठी चेअरबेड्स तयार केले आहेत. त्यातील अर्ध्याहून अधिक चेअरवेड्स निकृष्टदर्जाचे असून त्याच्या दुरुस्तीचे आदेश न्यायालयीन समितीने दिले होते. परंतु, अजूनही यातील बहुतांश चेअरबेडचे तडे जैसे थेच आहे. जलवाहिनीतून प्रेशरने पाणीपुरवठा सुरू केल्यास चेअरबेड्सवरील पाईप निखळून पडेल, अशी भीतीही सूत्रांनी व्यक्त केली आहे.
जॅकवेलच्या गेट्सचे महत्त्व
नदी, धरण, कालव्यातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवणे, आवश्यकतेनुसार पंपिंगसाठी योग्य जलस्तर राखता येतो. देखभाल व दुरुस्तीसाठी जॅकवेलमध्ये येणारे पाणी बंद करता येते. इनलेट बंद करून साफसफाई, गाळ काढणे, स्क्रीन दुरुस्ती, तरंगता कचरा, जलवनस्पती, प्रदूषण किंवा तपासणी सुरक्षितपणे करता येते, पूरस्थिती गेट्स बंद करुन दूषित पाणी, गाळ आत येण्यापासून रोखता येते.