

Heatwave Strikes as Early as March: Sambhajinagar City's Temperature Soars to 39.8 Degrees
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा तीव्र होण्यास सुरुवात झाली असून, गुरुवारी (दि.१२) शहराचे कमाल तापमान तब्बल ३९.८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. त्याचवेळी किमान तापमान १९.१ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. त्यामुळे दिवसा उन्हाचा चटका चांगलाच जाणवत असून, नागरिकांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. किमान तापमानात काहीअंशी वाढ झाल्याने रात्री असाह्य उकाडा वाढला आहे.
मागील आठवडाभरापासून शहरातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. यासोबतच वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाणही सुमारे १९ टक्क्यांवर पोहोचल्याने उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. दुपारच्या सुमारास रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याचे चित्र आहे. उन्हाचा कडाका बाढल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली आहे. चिकलठाणा येथील वेधशाळेच्या माहितीनुसार, यंदाच्या वर्षातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान नोंदविण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी शहरातील तापमान ३४ ते ३६ अंशांदरम्यान होते. मात्र गेल्या दहा ते बारा दिवसांत तापमानात झपाट्याने वाढ होत ती थेट ३९ अंशांच्या पुढे गेले आहे. दरम्यान, वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवर उन्हाची तीव्रता स्पष्टपणे जाणवत आहे. विशेषतः दुचाकीस्वार, बांधकाम मजूर तसेच मैदानी काम करणाऱ्या कामगारांना उन्हाचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील काही ठिकाणी दुपारी उष्णतेमुळे बाजारपेठांतील गर्दीतही घट झाल्याचे दिसून आले.
काळजी घेण्याचे आवाहन
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी पिणे, हलका आहार घेणे आणि उन्हापासून संरक्षण करण्यासाठी योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लवकरच चाळीशीचा टप्पा ओलांडणार
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा तापमानात टप्प्याटप्प्याने वाढ होत असून, मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत शहराचे तापमान ४० अंशांच्या पुढे सरकण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.