

Ginger Traders Bring Prosperous Days to Laborers
गणेश शिंदे :
घाटनांद्रा : सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा परिसर सध्या आले (अद्रक) प्रक्रिया व सुंठ साठी कच्चामाल उत्पादनासाठी महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर आलेपासून सुंठ तयार करण्यासाठी कच्चामाल तयार करणारा व्यापारीवर्ग निर्माण झाला असून, याचा थेट फायदा मजुरांना होत आहे. परिणामी, परिसरात मजुरांसाठी अक्षरशः सुगीचे दिवस आले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
घाटनांद्रा परिसरातील शेतकऱ्यांनी घेतलेल्या आले पिकानंतर शेतात उरलेले अद्रकाचे तुकडे गोळा करण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. महिला व पुरुष मजूर शेतांच्या बांधावर जाऊन हे तुकडे वेचून व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी आणत आहेत. यात ओल्या अद्रकाला व्यापाऱ्याकडे २५ ते ३० रुपये, तर वाळलेल्या अगकाला सुंठसाठी सध्या बाजारात १०० ते १२० रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्यामुळे मजुरांना चांगला मोबदला मिळत आहे.
विशेष म्हणजे, एक महिला मजूर दिवसाला सुमारे १००० रुपयांपर्यंतचे अद्रक वेचून आणत असल्याने पारंपरिक शेतीमजुरीपेक्षा अधिक उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे मजुरांनी शेतातील नियमित कामांकडे पाठ फिरवली असून, आले वेचण्याच्या कामाला प्राधान्य दिले आहे. याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे.
दररोज ४०० ते ५०० रुपये मजुरी देण्याची तयारी असूनही शेतकऱ्यांना मजूर मिळत नाहीत. सध्या परिसरात पूर्व हंगामी मिरची लागवडीचा हंगाम सुरू असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज भासत आहे. मात्र मजूर उपलब्ध नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. एकीकडे मजुरांचे उत्पन्न वाढत असताना, दुसरीकडे शेतीची कामे रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मजूर-शेतकरी समतोल बिघडल्याचे चित्र घाटनांद्रा परिसरात स्पष्टपणे दिसून येत आहे.