

Fear of blood donation due to superstition and misunderstanding
राहुल जांगडे
छत्रपती संभाजीनगर : प्रत्येक सदृढ व निरोगी व्यक्तीने रक्तदान करावे, असे आवाहन वारंवार केले जाते. यासाठी शासन, प्रशासनस्तरावर जनजागृतीही सुरू असते. मात्र, अद्यापही रक्तदानासंबधी काही गैरसमज, अंधश्रद्धा आणि भीती असल्यामुळे रक्तदानाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे वारंवार रक्ताचा तुटवडा निर्माण होऊन अनेकांना रक्ताची शोधाशोध करावी लागत असल्याचे चित्र कायम आहे.
छत्रपती संभाजीनगर शहर हे मागील काही वर्षांत मेडिकल हब म्हणून नावारूपास येत आहे. शहरात घाटी, सुपर स्पेशालिटी रुग्णालय, कर्करोग रुग्णालय, जिल्हा रुग्णालय या शासकीय रुग्णालयासोबत अनेक खासगी मोठी हॉस्पिटल्स, सुपर स्पेशालिटी रुग्णालये आहेत. त्यामुळे शहरातील नव्हे तर मराठवाड्यासह विदर्भ, खान्देश, नाशिक आणि इतर अनेक जिल्ह्यातून उपचारासाठी येथे मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होतात.
या रुग्णांना महिन्याला हजारो रक्त पिशव्यांची गरज पडते. त्या तुलनेत रक्त संकलन कमी होत असल्याने याचा आर्थिक फटका रुग्णांच्या नातेवाईकांना सहन करावा लागतो. शहरासह जिल्ह्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, मात्र तुलनेत रक्तदात्याचे प्रमाण कमीच आहे. सुमारे ३५ लाखांहून अधिक लोकसंख्येच्या जिल्ह्यात रक्तदात्यांचे संख्या एक लाखावर नसल्याची खंत रक्तपेढ्यांकडून व्यक्त करण्यात आली. दात्यांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
१८ ते ६० वर्ष वयोगटातील कोणताही सदृढ व निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकतो. मात्र, रक्तदानाचे प्रमाण कमी असल्याने दरवर्षी रक्ताचा तुटवडा भासतो. दात्यांनी न घाबरता उत्स्फूर्तपणे रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन घाटी उपाधिष्ठाता तथा रक्तपेढी विभागप्रमुख डॉ. भारत सोनवणे यांनी केले.