पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत जीवन संपवलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून १ लाख ३० हजारांची अर्थिक मदत देण्यात आली आहे. तर आतापर्यंत १३ जणांच्या वारसांना प्रत्येकी दहा लाखांची मदत देण्यात आली आहे. तसेच पाच प्रकरणांत मदतीसंदर्भात शासन दरबारी प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी सांगितले असून, गुरुवारी (दि.२८) छत्रपती संभाजीनगर तालुक्याच्या लाडसावंगीतील बाबासाहेब जनार्दन पडूळ यांच्या वारसांच्या आर्थिक मदतीसाठीचा प्रस्ताव गुरुवारी पाठवण्यात आला आहे. Maratha Reservation
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करताना जिल्ह्यातील २२ जणांच्या उपचारावर शासनाकडून खर्च करण्यात आला आहे. या खर्चापोटी रुग्णालयाला २५ लाख २३ हजार ३७५ रुपयांचे बिल देण्यात आले आहे. तसेच आंदोलनादम्यान मृत पावलेल्या कुटुंबीयांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी दहा लाखांची मदत करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १९ आंदोलकांनी प्राण गमावले आहेत. यापैकी १४ जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दहा लाखांची मदत करण्यात आली आहे. तर पाच जणांच्या वारसांना मदत देण्यासाठी शासन दरबारी प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
शुभम गाडेकर (कोलठाण), बाळू भोकरे (धामणगाव, ता. फुलंब्री), गणेश कुबेर (आपतगाव), उद्धव कुबेर (कुबेर गेवराई), सुरेश सोनवणे (देवगाव, ता. कन्नड), नानासाहेब पवार (पिंपळखुटा), संदीप बोराडे (पिसादेवी, ता. छत्रपती संभाजीनगर), गणेश जंगले (चिंचोली नकीब), विजय राकडे (खामगाव), ज्ञानेश्वर मोहारे (वारेगाव), गजानन गणोरी (ता. फुलंब्री), सुरेश वडेकर (गोपाळपूर) अशा बारा जणांना तर जालना जिल्ह्यातील सुनील कावळे यांच्यासह १३ जणांना मदतीचा हात देण्यात आला आहे.
पैठण तालुक्यातील आदित्य जाधव, आपेगावातील सोपान औटे, फुलंब्री तालुक्यातील जळगाव मेटेमधील भीमराव पाचपुते, छत्रपती संभाजीनगर तालुक्याच्या पिसादेवीतील दादाराव सपकाळ तसेच गुरुवारी आत्महत्या केलेल्या बाबासाहेब पडूळ यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक मदतीचा प्रस्ताव शासन दरबारी पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.