![मराठा समाजाला आरक्षण नाकारण्याचा शासनाचा डाव; मनोज जरांगेंचा आरोप](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F06%2FUntitled-design-1-109.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : सगेसोयरेची अंमलबजावणी करून नंतर त्यास न्यायालयात आव्हान देण्याची व्यवस्था करायची आणि पुढे अंतिमतः मराठा समाजाला आरक्षणच नाकारायचे, असा राज्य सरकारचा डाव असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे-पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये केला. ते गुरुवारी माध्यमांशी बोलत होते.
सरकारने आधी मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावून दिला. यानंतर आता दुसरीकडे सगेसोयरेचे आरक्षण टिकणार असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, काहीही झाले तरी आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहोत. मराठा समाजाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवला आहे. मराठ्यांना आरक्षणासाठी आम्ही 13 जुलैपर्यंत सरकारला मुदत दिली आहे. त्या मुदतीत आरक्षण द्या. अन्यथा आम्हाला राजकारणाचा मार्ग धरावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
आम्ही प्रा. लक्ष्मण हाके यांना विरोधक मानले नाही. त्यांनी ओबीसींसंदर्भातील त्यांचे उपोषण सुरू ठेवावे. मात्र, राज्यातील एक ज्येष्ठ मंत्री आमच्या विरोधात सातत्याने बोलत आहेत, असा टोला जरांगेंनी छगन भुजबळ यांना लगावला. प्रकाश आंबेडकर यांचा आम्ही आदर करतो. त्यामुळे त्यांनी कोणती भूमिका घेतली यावर मी बोलणार नाही, असे जरांगे म्हणाले.