

Electricity theft for former deputy mayor's Akashdeep, incident in Mayur Park
अमित मोरे
छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या निवडणुका होण्यास आणखी दोन महिन्यांचा अवधी आहे. परंतु त्यापूर्वीच शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये प्रचारांची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. याच प्रचाराच्या ओघात एका माजी उपमहापौरांनी मयूर पार्कमधील चौकाचौकांत आकाशदीप लावले, परंतु ते प्रकाशमय करण्यासाठी थेट महावितरणाच्या खांबावरून वीज चोरी केल्याने चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे ४ ते ५ हजारांची थकबाकी असलेल्यांचे कनेक्शन कापणाऱ्या महावितरणाच्या अधिकाऱ्यांच्या नजरेत ही चोरी अद्याप कशी आली नाही, याचे आश्चर्य ग्राहकांमध्ये आहे.
महापालिकेच्या निवडणुका तब्बल दहा वर्षांनंतर होत आहेत. त्यामुळे प्रत्येक वसाहतीमध्ये किमान तीन ते चार इच्छुक आढळत आहेत. एवढेच नव्हे तर या इच्छुकांच्या प्रचारामुळे आता वसाहतींमधील नागरिकही त्रस्त झाले आहेत. काहींनी निवडणुका आल्या तरी कशासाठी, असे म्हणण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या या निवडणुका होण्यास किमान दोन महिन्यांचा अवधी आहे. सध्या केवळ निवडणूक पूर्व तयारीची प्रक्रिया प्रशासकीय यंत्रणांकडून सुरू आहे. या सर्व प्रक्रियेनंतर निवडणुकीची खऱ्या आथर्थान घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. मात्र आताच निवडणुका सुरू झाल्या, या अविर्भावात अनेक इच्छुकांनी आपापल्या निवडलेल्या प्रभागांमधील वसाहतींमध्ये पोस्टर, होर्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, मयूर पार्क येथे माजी उपमहापौरांनी स्वतःच्या प्रचारासाठी पोस्टरसह आकाशदीप लावले आहेत. मात्र चौकाचौकांत लावलेल्या या आकाशदीपला प्रकाशमय करण्यासाठी महावितरणच्या खांबावरून वीज घेतली आहे.
कुठलेही तात्पुरते वीज मीटर न घेता केवळ वायर टाकून हा वीज पुरवठा घेण्यात आल्याने ही वीज चोरी असून, महावितरणच्या अधिकाऱ्यांचे या चोरीकडे अद्यापही लक्ष गेलेले नाही, हे विशेष आहे. सध्या ४ ते ५ हजार रुपयांची वीज बिलाची
थकबाकी असली तरी महावितरणचे पथक वीज कनेक्शन कट करून जातात अन् आता या वीज चोरीचे काय, असा सवाल परिसरातील व्यावसायिक, नागरिकांतून प्रश्न उपस्थित केला जात आहे.चार ठिकाणी लावले दिवे
चार ठिकाणी लावले दिवे
मयूर पार्क वॉर्डात येणाऱ्या चार वसाहतींमध्ये अशा प्रकारचे आकाशदीप लावण्यात आले आहे. याविरोधात काहींनी महावितरणाकडे तक्रारही केल्याची चर्चा आहे.
सामान्यांना एक न्याय अन्...
मयूर पार्क परिसरात लावण्यात आलेले हे आकाशदीप माजी महापौर विजय औताडे यांचे आहेत. हे आकाशदीप वीज चोरी करून प्रकाशमय केले आहेत. या वीज चोरीकडे अद्यापही महावितरणचे दुर्लक्षच होत आहे. ललित सरदेशपांडे, जिल्हा सचिव, शिवसेना