

Declare a drought and provide financial assistance to farmers congress
मंठा, पुढारी वृत्तसेवाः सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि. ८) काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विवेक घारे यांच्या नेतृत्वाखाली मंठा येथे छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.
पावसाअभावी मंठा तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी आर्थिक संकटात आहे. शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक नष्ट झाले आहे, तर कपाशीचे पीकदेखील हातून गेले आहे. आहे त्या पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढला असल्याने शेतकऱ्यांनी पिकांसाठी केलेला खर्चदेखील निघणे अवघड झाले आहे.
बैलगाडी मोर्चात खासदार डॉ. कल्याण काळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण दळे, माजी आमदार धोंडीराम राठोड, माजी जिल्हाध्यक्ष राजेभाऊ देशमुख, काँग्रेस तालुकाध्यक्ष विवेक घारे, परतूर तालुकाध्यक्ष बालासाहेब आकात, जिल्हा महासचिव शरद बोराडे माजी तालुकाध्यक्ष निळकंठ वायाळ, भीमशक्ती जिल्हाध्यक्ष प्रकाश घुले, नगरसेवक राजेश खंदारे, प्रदेश सरचिटणीस ओबीसी विभाग सरिता वरणकर, डॉ. शिवाजी गणगे, सुरेश पवार, रामप्रसाद जाधव, सुरेश वाव्हळे, अशोक चव्हाण आदी सहभागी झाले होते. मोर्चाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला. यावेळी तहसीलदार सुमन मोरे यांनी शासनाच्या वतीने निवेदन स्वीकारले.
दुष्काळ जाहीर होईपर्यंत लढा सुरूचः खा. काळे
सध्याचे शासन सर्वच बाजूंनी अपयशी ठरले असून, हे सरकार जाती-जातीत, धर्माधर्मांत वाद निर्माण करीत आहे. तुम्ही जातीत, धर्मात भांडत राहा, आम्हाला राज्य करायचे आहे, ही सध्याच्या शासनाची नीती आहे. आता आपण सर्वांनी एकत्रित येऊन लढा देणे गरजेचे आहे. जोपर्यंत दुष्काळ जाहीर होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी यावेळी सांगितले.