

Path cleared for releasing overflow water into the Shivna River
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : नांदूर-मधमेश्वर धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी पाटाद्वारे अथवा कॅनॉलमार्गे शिवना नदीच्या पात्रात सोडण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी मालुंजा खुर्द (ता. गंगापूर) येथे शेतकऱ्यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण अखेर तीन दिवसांनी मागे घेण्यात आले. आमदार सतीश चव्हाण यांनी बुधवारी उपोषणस्थळी भेट देत संबंधित अधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आंदोलन स्थगित केले.
आश्वासन नांदूर-मधमेश्वर धरणातील मोठ्या प्रमाणातील ओव्हरफ्लोचे पाणी गोदावरी नदीपात्रात वाहून जाते. हे पाणी एक्सप्रेस कॅनॉलद्वारे शिवना नदीत वळविल्यास शिरजगाव, संजरपूर, मालुंजा खुर्दसह परिसरातील ३० ते ४० गावांना मोठा फायदा होऊ शकतो. शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होऊन दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो, अशी आंदोलकांची भूमिका होती.
टेलपर्यंत रोटेशनचे पाणी योग्य पद्धतीने व नियोजनबद्धरीत्या पोहोचवावे, तसेच उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी पाटबंधारे विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. यासंदर्भात पाटबंधारे उपविभाग, गंगापूर येथील अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले होते.
दरम्यान, तीन दिवस उपोषण सुरू असतानाही प्रशासनाकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. अखेर आमदार सतीश चव्हाण यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. लवकरच संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर योगेश पवार, सोपान कवडे, विनायक मनाळ व संदीप पवार यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी प्रदेश सरचिटणीस दिलीप बनकर, महेश उबाळे, वाल्मिक शिरसाठ आदी उपस्थित होते.
३० ते ४० गावांना मिळणार दिलासा
नांदूर-मधमेश्वर धरणातील ओव्हरफ्लोचे पाणी शिवना नदीत वळविल्यास परिसरातील ३० ते ४० गावांचा पाणीप्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे संबंधित विभागाने बैठकीत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.