

छत्रपती संभाजीनगर : लसाच्या हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मंडप टाकत असताना मध्यरात्री दोन तरुणांनी मंडपात घुसून नवरदेवाच्या भावावर आणि दाजीवर चाकूने जीवघेणा हल्ला केला. 'तुझा भाऊ नवरदेव कुठेय?' अशी विचारणा करत त्यांनी शिवीगाळ केली आणि हल्ला केला. ही घटना रविवारी (दि.३०) मध्यरात्री १:२६ वाजेच्या सुमारास अरिहंतनगर येथे घडली. याप्रकरणी जवाहर नगर पोलिस ठाण्यात दोघांवर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयुष हेमंत साळवे (१८, रा. बौद्ध नगर, जवाहर कॉलनी) आणि गौरव राजीव जाधव (१८, रा. पंचशील नगर, जवाहर कॉलनी) अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी लक्ष्मण अप्पासाहेब बुचुडे (२०, रा. अरिहंत नगर, जैन मंदिराजवळ) याच्या तक्रारीनुसार, त्याचा मोठा भाऊ दत्ता बुचुडे याचे रविवारी (दि. ३०) लग्न होते. त्यासाठी घरी नातेवाईक आलेले होते. शनिवारी (दि. २९) रात्री घरासमोर हळदीचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रम संपल्यानंतर रात्री उशिरा टाकण्याचे काम सुरू होते.
रविवारी मध्यरात्री १:२६ वाजेच्या सुमारास आरोपी आयुष साळवे आणि गौरव जाधव हे दोघे अचानक मंडपात घुसले. आयुषने लक्ष्मणला विचारले, "तुझा भाऊ नवरदेव दत्ता बुचुडे कुठे आहे?" लक्ष्मणने तो घरात झोपला असल्याचे सांगताच दोन्ही आरोपींनी मोठ्याने आरडाओरड करत करण्यास शिवीगाळ सुरुवात केली.
लक्ष्मणने त्यांना येथे मंडपात थांबू नका, तुमच्या घरी निघून जा असे सांगितले. याचा राग आल्याने आरोपी आयुष साळवे याने आपल्या कमरेला लपवलेला चाकू बाहेर काढला आणि थेट लक्ष्मणच्या डोक्यात वार करून त्याला जखमी केले.तर दुसरा आरोपी गौरव जाधव याने लक्ष्मणला मारहाण केली.
कमरेत वार झाल्याने दाजीला ४ टाके
लक्ष्मणला मारहाण होत असल्याचे पाहून त्याचे दाजी (बहिणीचे पती) किरण मुरलीधर पाटील (रा. खेडगाव खुर्द) हे त्याला सोडवण्यासाठी मध्ये पडले. त्यावेळी आरोपी गौरवने दाजी किरण पाटील यांचे हात घट्ट पकडले आणि आरोपी आयुष साळवे याने त्यांच्या डाव्या कमरेखाली चाकू खुपसून त्यांना गंभीर जखमी केले. तत्काळ ११२ वर कॉल केल्याने पोलिसांची गाडी आली. पोलिसांनी जखमींना घाटीत दाखल केले. तिथे दाजी किरण पाटील यांच्या कमरेच्या जखमेवर ४ टाके पडले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार रमेश जाधव करत आहेत.