

छत्रपती संभाजीनगर : राज्यात आलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे विजेची मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र अचानक वाढलेल्या विजेच्या मागणीचा भार महावितरणच्या वाहिन्यांनाही सोसवेना झाला आहे. गुरुवारी रात्री पन्नालालनगर उपकेंद्राकडे येणारे दोन्ही 33 केव्ही फीडर ओव्हरलोड होऊन बंद पडले. त्यामुळे जवळपास 15 ते 20 हजार नागरिकांचा वीजपुरवठा तासभर बंद राहिला. महावितरणच्या अभियंते, कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून वीजपुरवठा पूर्ववत केला
संध्याकाळच्या वेळी विजेची सर्वोच्च मागणी असते. गेल्या काही दिवसांत राज्यभर आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे विजेची मागणी प्रचंड वाढलेली आहे. शहरात गुरुवारी कमाल तापमान 41.4 अंश सेल्सियस होते. उकाड्यापासून सुटका करून घेण्यासाठी फॅन, कुलर, एसी ही विद्युत उपकरणे नागरिक वापरत आहेत.
महावितरणच्या 33 केव्ही पन्नालालनगर उपकेंद्रास महापारेषणच्या चिकलठाणा व सातारा येथील 132 केव्ही उपकेंद्राद्वारे वीजपुरवठा केला जातो. मात्र विजेच्या ढत्या मागणीचा भार न पेलल्यामुळे सातारा फीडर 7.15 च्या सुमारास बंद पडला. त्यामुळे या फीडरवरील भार चिकलठाणा फीडरवर वळवून वीजपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र हा फीडर ओव्हरलोड होऊन 8.52 वाजता बंद पडला. दोन्ही फीडर बंद पडल्यामुळे पन्नालालनगर उपकेंद्र काळोखात गेले.
दरम्यान, महावितरणच्या अभियंते, कर्मचाऱ्यांनी बिघाड शोधण्यासाठी तातडीने दोन्ही फीडरवर पेट्रोलिंग सुरू केले. रात्रीच्या अंधारात बॅटरीच्या उजेडात तंत्रज्ञांनी प्रत्येक खांब तपासला. तबरीच पायपीट केल्यावर चिकलठाणा फीडरवार हनुमाननगरमध्ये तर सातारा फीडरवर एमआयटी कॉलेजजवळ खांबावरील जंप तुटल्याचे निदर्शनास आले.
अथक परिश्रमानंतर चिकलठाणा फीडर रात्री 10.05 वाजता सुरू झाला. त्यामुळे पन्नालालनगर उपकेंद्रावरील सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले. दहा मिनिटांच्या अंतराने सातारा फीडरही सुरू झाला. कार्यकारी अभियंता महेंद्र देशमुख व त्यांच्या 30 सहकाऱ्यांनी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी परिश्रम घेतले.