

Mahavitaran Accelerates Electricity Bill Recovery; Power Supply Disconnected for 2,497 Consumers
लातूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील लघुदाब वर्गवारीतील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वीजग्राहकांसह इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे थकीत ३६ कोटी ३० लाख व चालू महिन्याचे ५८ कोटी १६ लाख अशा एकत्रित ९४ कोटी ४६ लाख रुपयांच्या वीजबिल वसुलीसाठी महावितरणने वसुली मोहीम मार्च अखेरीस अधिक आक्रमक केली आहे.
थकबाकीदार वीजग्राहक रडारवर असून वारंवार सूचना देऊनही दाद न देणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा थेट मीटर काढून खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. वीज खंडित केल्यानंतर कुणी परस्पर जोडल्यास महावितरणतर्फे थेट पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे आज रोजी ९४ कोटी ४६ लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. वसुलीसाठी संपूर्ण जिल्ह्यात महावितरणचे सर्व अभियंते, अधिकारी, कर्मचारी भर उन्हात दारोदार फिरत आहेत. अनेक ग्राहक तातडीने बिल भरून सहकार्य करत आहेत. मात्र जे ग्राहक बिल भरण्यास प्रतिसाद देत नाहीत, त्यांचा वीजपुरवठा नाईलाजास्तव खंडित करण्यात येत आहे. काल पर्यंत २ हजार ४९७ वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आला आहे. त्याचबरोबर स्मार्ट मीटर असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा ऑटो डिस्कनेक्ट होत आहे.
गेल्या चोवीस दिवसांत लातूर मंडळातील थकबाकीदार ग्राहकांनी ४७कोटी ७३ लाख रुपयांच्या बिलांचा भरणा केला आहे. हे प्रमाण चालू विलाच्या केवळ ८२ टक्केच असून मागील थकबाकीला स्पर्शही झालेला नाही. यामधे निलंगा विभागाची मागील थकबाकी ४ कोटी ८५ लाख असून चालू महिन्याचे ९ कोटी ४८ लाख वसुल करावयाचे आहेत.
यापैकी केवळ ८ कोटी २७ लाख वसूल झाले आहेत. तर उदगीर विभागातील ग्राहकांकडे १७ कोटी २३ लाख थकबाकी असून चालू महिन्याचे १५ कोटी ९० लाख वसूल करण्याचे आव्हान आहे. कालपर्यंत यापैकी केवळ १३ कोटी २८ लाख वसूल करण्यात यश मिळाले आहे.
त्याचबरोबर लातूर विभागातील ग्राहकांकडे १४ कोटी २१ लाख थकबाकी असून चालू महिन्याचे ३२ कोटी ७८ लाख वसूल करण्याचे आव्हान आहे. कालपर्यंत यापैकी केवळ २६ कोटी १८ लाख वसूल करण्यात आले आहेत. सर्वांनी थकीत वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन लातूर परिमंडलाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले यांनी केले आहे.